उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 राज्यात महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस होत असलेली वाढ लक्षात घेऊन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दि.२२ सप्टेंबर रोजी केली आहे.

राज्यातील महिलांवर होत असलेल्या वाढत्या अत्याचाराच्या घटना आपणास अस्वस्थ करत नाहीत का याबाबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी १५ सप्टेंबर रोजी आपल्याकडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक करण्याची मागणी देखील केली आहे.

महिलावरील अत्याचारांचा विषय राष्ट्रव्यापी असल्याचे सांगत महिला सुरक्षित सारख्या गंभीर व संवेदनशील विषयावर असंवेदनशीलता दाखवत राजकारण सुरू आहे ही बाब पुरोगामी महाराष्ट्रासाठी अशोभनीय आहे भारतीय जनता पार्टी महिला आघाडी या कृतीचा जाहीर निषेध करते महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे वाढते प्रमाण राज्यातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक करावी व राज्यपाल यांच्या सूचनेनुसार दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे,अशी मागणी जिल्हा भाजपच्या वतीने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

 या निवेदनावर भाजपाच्या अर्चना अंबुरे, भाजपा युवती मोर्चा जिल्हाध्यक्षा पुजा राठोड, अनुराधा जाधव, रोहिणी पाटील, माधुरी देवकते, लता शिंगाडे आदींच्या सह्या आहेत. 


 
Top