उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून जिल्हावासीयांकडून सातत्याने करत आहेत. विद्यापीठ उपकेंद्र मंजूर करून घेतल्यानंतर भविष्यात याचे स्वतंत्र विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी एमआयडीसी ची ६० एकर जागा खास बाब म्हणून उपकेंद्रासाठी उपलब्ध करून घेतली होती. दि. १९ ऑगस्ट २०२० रोजी आपल्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीचा संदर्भ देत उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ सुरू करण्याच्या अनुषंगाने माजी कुलगुरू श्री.आर.एन.माळी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केल्याचे जिल्ह्याचे खासदार व उस्मानाबादचे आमदार यांच्याकडून  प्रसिद्ध करण्यात आले होते.

परंतु यानंतर दि १९ सप्टेंबर २०२० रोजीच्या औरंगाबाद येथील आपल्या पत्रकार परिषदे मध्ये ‘विद्यापीठाचे विभाजन नाही, उस्मानाबाद उपकेंद्र विकासासाठी स्थापन केलेली समिती विभाजनासाठी नाही, विद्यापीठाचे दोन भाग करण्याचा कुठलाही प्रयत्न महाविकास आघाडी सरकारकडून होणार नाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मोठ्या कष्टाने निर्माण झाले असून उस्मानाबादला स्वतंत्र विद्यापीठ करण्याचा प्रश्नच नाही’ असे स्पष्टपणे नमूद होते.

जिल्ह्याच्या शैक्षणिक व आर्थिक समृध्दीसाठी उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ होणे आवश्यक आहे. राज्याचे सन्माननीय मंत्री एक बोलतात तर जिल्ह्याचे सत्ताधारी खासदार व आमदार वेगळे बोलतात. यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थी व नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होत आहे. या विषयावर परस्पर विरोधी वक्तव्ये चीड निर्माण करणारी असून  आपण शासनाची अधिकृत भूमिका तात्काळ स्पष्ट करून उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ मंजूर करावे, अशी आग्रही मागणी उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थी व नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

या प्रसंगी निवेदन देतांना भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, नेताजी पाटील, ॲड.खंडेराव चौरे,  शिवाजी गिड्डे, अमित कदम, सुरज शेरकर, सचिन लोंढे, हिम्मत भोसले, मनोजसिंह ठाकुर, गणेश येडके, अजित खापरे, चंद्रकांत मुंडे, शंकर मोरे, स्वप्नील नाईकवाडी तसेच शहरातील भाजपाचे व युवा मोर्चाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते. 


 
Top