जागतिक पर्यावरण दिनांनिमित्त, देशातील सर्व जिल्ह्यात इथेनॉल निर्मिती प्रकल्प सुरु करून, देशाचे वार्षिक 30000 कोटी रुपये वाचविण्या संदर्भात फोरम ऑफ उस्मानाबाद सिटिझन्स ( फूक ) च्या वतीने ६ जून रोजी जिल्हाधिकारी मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, जागतिक पर्यावरण दिवसा निमित्त स्वछ ऊर्जा निर्मिती विषयावरील अहवालाचे प्रकाशन आपल्या हस्ते संपन्न झाले. ज्यामध्ये सोलार ऊर्जा, पवन ऊर्जा, जैविक इंधन ऊर्जा व अन्य विविध स्वछ व स्वस्त ऊर्जा निर्मिती बाबतचा अभ्यास, त्या क्षेत्रातील तज्ञांनी मांडला आहे. विशेष म्हणजे, जैविक इंधन ऊर्जा ही इतर सर्व ऊर्जापेक्षा स्वस्त व खात्रीशीर असून, देशात उपलब्ध साधन क्षमतेचा परिपूर्ण वापर करून हिची निर्मिती केल्यास, देशाची वार्षिक जवळपास तीस हजार कोटी रुपयाची बचत होऊ शकते, अशी मांडणी या अहवालात केलेली आहे.
जैविक इंधन ऊर्जेचा वापर सुरु केल्यास केंद्र सरकारचे प्रतीवर्षी तीस हजार कोटी रुपायांची बचत होणार आहे. केवळ एक वर्षाच्या बचतिमध्ये, म्हणजेच 30 हजार कोटी रुपयाचे समान वाटप केल्यास, देशातील प्रत्येक जिल्ह्याच्या हिष्याला 50 कोटी रुपये येतात. यामधून सर्व 550 जिल्ह्यामध्ये इथेनॉल निर्मिती कारखाने सुरु होऊ शकतात. ऊस, जवारी, बाजरी, गहू व इतर अनेक धान्यापासुन इथेनॉल निर्मिती होते. या पिकांचे उत्पादान जवळपास देशातील सर्वच जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात होते. त्यामुळे देशातील सर्वच जिल्ह्यात हे प्रकल्प सुरु केले जावू शकतात. 50 कोटी रुपयात एक इथेनॉल निर्मिती प्रकल्प आरामात उभा राहू शकतो. या ऊर्जा निर्मितीमुळे केवळ पैशाची बचतच होणार नसून, प्रत्येक जिल्ह्यात प्रकल्प उभा केल्याने त्या त्या जिल्यातील तरुणांना रोजगार मिळनार आहे . त्या त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाला चांगला भाव मिळनार आहे, हे विशेष. आपण एक धाडशी व धडाडीने निर्णय घेणारे प्रधानमंत्री आहात. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने, देशातील सर्व 550 जिल्ह्यात इथेनॉल निर्मिती प्रकल्पाच्या निर्मितीचा निर्णय घ्यावा. त्यानिमित्ताने देशातील तरुणांच्या हाताला काम व शेतकऱ्याच्या मालाला वाढीव दाम देण्याचे श्रेय आपण घ्यावे, अशी विनंती फूक संघटनेच्या वतीने करण्यता आली आहे. निवेदनावर अध्यक्ष एम. डी. देशमुख ,सचिव धर्मवीर कदम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.