ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावचा विविधांगी विकास साधण्याबरोबरच खास सरपंचासाठीच कार्यरत असलेल्या सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र या संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हा समन्वयकपदी उस्मानाबाद तालुक्यातील जहागीरदारवाडी येथील राज शशिकांत राठोड यांची निवड करण्यात आली.
राज राठोड यांच्या निवडीचे पत्र सरपंच परिषदचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे व सरचिटणीस विकास जाधव यांनी राठोड यांना दिले आहे. दिलेल्या पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, परिषदचे सभासद वाढविण्याबरोबरच तालुकास्तरावर समन्वयकांच्या निवडी करून संघटनेच्या ध्येय धोरणानुसार काम करावे. तसेच संघटना वाढीसाठी प्रयत्न करावेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील सरपंचांच्या असणाऱ्या विविध अडीअडचणी सरकार दरबारी मांडून त्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक गावातील सरपंचांना या संघटनेत सामावून घेऊन त्यांना न्याय देणार असल्याचे राठोड यांनी सांगितले. या निवडीबद्दल प्रदेश उपाध्यक्ष अनिल गीते- पाटील, प्रदेश महासचिव विकास जाधव, राज्य महिला अध्यक्षा राणी पाटील, प्रदेश कोअर कमिटीचे प्रमुख अविनाश आव्हाड, राज्य महिला उपाध्यक्षा अश्विनी थोरात, सुप्रिया जेथे यांनी या अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत