उस्मानाबाद / प्रतिनिधी-  

ब्रेक द चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली असून कोरोना रुग्ण पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याचे आदेश दिले आहेत मात्र राज्यातील उस्मानाबादसह 10 जिल्ह्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर हा 10 टक्के पेक्षा जास्त असल्याने तूर्तास तरी या जिल्ह्याना दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचा 29 मे पर्यंतचा पॉझिटिव्ह दर हा 10.97 असल्याने मुख्यमंत्री यांनी जाहीर केल्याप्रमाणे काही अटी शिथील होण्याची शक्यता कमीच आहे. उस्मानाबाद, बुलढाणा, कोल्हापूर,मुंबई उप नगरे, पुणे, रायगड,रत्नागिरी, सांगली, सातारा व सिंधुदुर्ग या 10 जिल्ह्याचा यात समावेश असुन सिंधुदुर्गचा सर्वाधिक 21.40 टक्के दर आहे तर सर्वात कमी जळगाव जिल्ह्याचा 2 टक्के आहे.

ब्रेक दि चेनचे आदेश राज्यात सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. २९ मे २०२१ च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली जाईल. 29 मे नुसार उस्मानाबाद जिल्ह्यात 36 टक्के ऑक्सिजन बेड शिल्लक होते. 

ऑनलाइन नोंदी प्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्याचा 23 मे ते 29 मे या काळातील साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर हा 10.22 टक्के आहे. या काळात 21 हजार 795 तपासणी करण्यात आल्या त्यात 2 हजार 229 कोरोना रुग्ण सापडले आहेत. राज्य सरकारने उपलब्ध केलेल्या माहितीनुसार 22 मे ते 28 मे या काळात उस्मानाबाद जिल्ह्यात 20 हजार 774 तपासण्या करण्यात आल्या त्यात 2 हजार 279 रुग्ण म्हणजे 10.97 टक्के रुग्ण सापडले. 29 मे पर्यंतचा साप्ताहिक पॉझिटिव्ह दर गृहीत धरला जाणार आहे मात्र गेल्या 3 ते 4 दिवसात उस्मानाबाद जिल्ह्यात 6 ते 8 टक्के रुग्ण पॉझिटिव्ह सापडत आहेत ही दिलासादायक बाब आहे. रॅपिड चाचणीत सुद्धा रुग्ण सापडण्याचे प्रमाण हे कमी 7 ते 10 टक्के दरम्यान आहे.

आयसीएमआरच्या पोर्टेलनुसार उस्मानाबाद जिल्ह्याचा 24 मे ते 30 मे या आठवड्यात साप्ताहिक पॉझिटिव्ह दर हा 10.8 टक्के आहे या काळात 21 हजार 287 तपासणी करण्यात आल्या त्यात 2 हजार 290 रुग्ण सापडले तर कोरोनाचा दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या तीन पटीने वाढली तरी प्रशासनाला मृत्युदर रोखण्यात यश मिळाले आहे. दुसऱ्या लाटेत 1 फेब्रुवारी पासून 30 मे या काळात 1 लाख 85 हजार 714 चाचणी करण्यात आल्या त्यात 40 हजार 303 रुग्ण सापडले या लाटेत 21.7 टक्के पॉझिटिव्हीटी दर होता अशी माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली.

कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी झाली म्हणजे संकट टळले नसून लोकांनी दक्षता घ्यावी तसेच प्रशासन सज्ज आहे.कोरोनाची कोणतीही लक्षणे अंगावर न काढता वेळीच तात्काळ उपचार घेणे गरजेचे आहे जेणेकरून मृत्यू टाळता येऊ शकतो , नागरिकांनी काळजी घेण्याचे व तात्काळ उपचार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केले आहे.

रुग्ण संख्या व रुग्णालय बेड उपलब्धता स्तिथी 

उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या आठवड्यात कोरोना बाबत दिलासादायक चित्र असून रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत आहे तर शासकीय व खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध होत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात 29 मेच्या आकडेवारीनुसार 85 कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटरमधील 965 पैकी 615 ऑक्सिजन बेडचा वापर सुरू होता तर 350 म्हणजे 36.26 टक्के रिकामे होते. 263 आयसीयू पैकी 180 रुग्ण होते तर 83 म्हणजे 31.55 टक्के रिकामे होते तर 4 हजार 584 नॉर्मल बेड पैकी 1 हजार 465 बेडचा वापर रुग्ण करीत होते तर 3 हजार 119 म्हणजे तब्बल 68 टक्के रिकामे होते. एकूण स्तिथी पहिली तर जिल्ह्यात कोरोनासाठी 5 हजार 812 बेड होते त्यापैकी 2 हजार 260 रुग्ण वापर होता तर 3 हजार 552 म्हणजे तब्बल 61 टक्के बेड रिकामे होते. हे समाधानकारक व दिलासादायक चित्र 29 मे चे होते त्यानंतर अनेक रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे तर रुग्ण सापडण्याचे प्रमाणही कमी झाले आहे त्यामुळे यापेक्षा अधिक चांगली स्तिथी नक्कीच असणार आहे.

 

 
Top