उस्मानाबाद/ प्रतिनिधी

शेतकऱ्यांना मोठया प्रमाणावर रोजगार आणि आर्थिकदृष्टया संक्षम करणाऱ्या तुती लागवडीचे क्षेत्र वाढविण्यासाठी जिल्हयातील शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत (मनरेगा) सर्वोतोपरी सर्व प्रकारची मदत करण्याचे नियोजन संबंधित विभागाने करावे, त्यास जिल्हा प्रशासन सर्व प्रकारची मदत करेल, असे आश्वासन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे दिले.

  जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयातर्फे आजपासून सुरु करावयाच्या महारेशीम अभियानाचे उदघाटन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आज सकाळी त्यांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी एस. बी. वराट,उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी, पालकमंत्रयांचे ओएसडी श्री. रितापुरे, श्रध्दानंद माने-पाटील आदी उपस्थित होते. यावेळी या अभियानाच्या वाहनास हिरवी झेंडी दाखवून या अभियानाचे उदघाटन करण्यात आले.

 जिल्हयात सध्या 134 गावांमधील 1737 एक्करवर तुती लागवड करण्यात आलेली आहे. रेशीम उद्योगामध्ये रोजगार निर्मितीची मोठी क्षमता असल्याने शासनाने 2016-17 पासून जिल्हयात मनरेगा अंतर्गत रेशीम उद्योगास सुरुवात केली आहे. या योजनेमध्ये प्रती एकरी तीन लाख 26 हजार रुपयापर्यंत लाभ शेतकऱ्यांना देण्यात येतो. जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत 1785 कामे सुरु असून कुशल आणि अकुशल अशी एकूण 1992.88 लक्ष रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात आला आहे, असे  सांगून श्री. दिवेगावकर म्हणाले की, लाभार्थी शेतकऱ्यांना रेशीम कोषांच्या विक्रीतून पहिल्यावर्षी एकरी 50 ते 75 हजार आणि दुसऱ्या वर्षापासून 15 वर्षापर्यंत एक ते दीड लाख रुपयांचे उत्पादन मिळू शकते. अंडीपुंज खरेदीवर 75 टक्के अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

  शासनाने या वर्षापासून रेशीम कोष विक्री पोटी  प्रती किलो कोषास 50 रुपयांप्रमाणे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेशीम उद्योग वाढीस मदत होणार आहे, तसेच रांजणी येथील एन.साई शुगर मिल येथे शेतकऱ्यांकडून रेशीम कोष  खरेदी करुन रेशीम धागा निर्मितीचा प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. तेथे प्रायोगिक तत्वावर सूत उत्पादन सुरु झाले आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात रेशीम उद्योग स्थिरावण्यास मदत होणार आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर म्हणाले की, जिल्ह्यात 2017 पासून राज्य शासनाने रेशीम क्षेत्र वाढविण्यासाठी प्रचार-प्रसिध्दीस प्राधान्य देऊन महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे. यावर्षी आजपासून 25 फेब्रुवारी 2021 पर्यंत हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या कालावधीत जिल्ह्यातील रेशीम उद्योग असलेल्या क्षेत्रात त्याबरोबरच लगतच्या गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.


 
Top