उस्मानाबाद/ प्रतिनिधी
येरमाळा पोलिसांनी दारोड्यातील आरोपींना अटक करून लुटीतील माल करत न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. तसेच जप्त माल न्यायालयाच्या आदेशाने मंगळवारी (दि. ९) पोलिस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या हस्ते निखील विजय लाड यांना परत केला.
दरम्यान, इर्टिगा कार (क्र. एम.एच. १३ सीएस ७३०८) ही २९ जानेवारी रोजी येरमाळा -उस्मानाबाद राष्ट्रीय महामार्गाने जात होती. दरम्यान रस्त्यावरील जॅकला कार धडकल्याने जॅक कार खाली अडकला. कार मालक निखिल विजय लाड (रा.पंढरपूर) कुटुंबीयासह खाली उतरले असता रस्त्याच्या बाजूस अंधारात दबा धरून बसलेल्या ६ बुरखाधारी तरुणांनी त्यांच्याजवळील १९० ग्रॅम सोन्याचे दागिने, ३ मनगटी घड्याळे, ४ भ्रमणध्वनी व ६१ हजार रुपये असा ऐवज लुटून नेला. तपासात पोलिस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली येरमाळा पोलिसांनी दारोड्यातील आरोपींना अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रसंगी येरमाळा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश मुंढे, पोलिस हेडकॉन्स्टेबल कोळी, पोलिस नाईक औताडे, चोपदार हे उपस्थित होते. आपली मालमत्ता परत मिळाल्याने निखिल लाड यांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले.