जळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्यात चर्मकार मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्या असून, शासनाने फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून आरोपींना फासावर चढवण्याची मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवक प्रदेशाध्यक्ष नितीन शेरखाने यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यात चर्मकार समाजाच्या २० वर्षीय मुलीवर अत्याचाराची घटना घडली असून, जळगाव जिल्ह्यात पारोळा तालुक्यात २० वर्षीय तरुणीवर अत्याचार करत विष पाजून खून करण्यात आला आहे. जळगाव आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातील अत्याचाराच्या घटना घडल्या असून, एका मुलीचा प्राण गेला आहे. तसेच गेल्या वर्षात अशा प्रकारच्या अनेक निंदनीय घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या आहेत. या घटनांनी महाराष्ट्र हादरला असून या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत आहोत. निवेदनावर युवक प्रदेशाध्यक्ष नितीन शेरखाने, जिल्हाध्यक्ष अॅड. गणपती कांबळे, जिल्हा सचिव बबनराव वाघमारे, सत्यजित शेरखाने, शहाजी शेरखाने, पंकज नरसुडे, रोहिदास गुजर, नितीन सलगरे, सौदागर पवार, समाजबांधव व पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.
