उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड-१९ संसर्ग वेगाने वाढत चालला असून दिवसेंदिवस जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत भयावह होत आहे. ग्रामीण भागात देखील याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत असून जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने वारंवार आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेऊन मार्गदर्शन करणे व प्रशासनाला सूचना करणे गरजेचे आहे. यामुळे परिस्तिथी नियंत्रणात आणण्यासाठी आठवड्याला आढावा बैठक घेण्यात यावी, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पालकमंत्री शंकरराव गडाख पाटील यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात आमदार पाटील यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी १७ मार्च रोजी पहिली आढावा बैठक घेतली होती. त्या बैठकीत आमदार पाटील यांनी जिल्ह्यात डॉक्टर्स व आयसीयू बेड कमी असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्याबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली होती.मात्र, दुर्दैवाने त्याला सहा महिने उलटून गेले असले तरी डॉक्टर्सच्या परिस्थितीत कांहीही बदल झालेला नसून आज देखील २५० रुग्णांसाठी उभारलेल्या कोविड रुग्णालयात अपेक्षित स्टाफच्या तुलनेत केवळ ३० टक्के उपलब्ध असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यातील कोविड-१९ ने बाधित रुग्णांची संख्या पाहता दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच गंभीर बनत आहे. ग्रामीण भागात देखील याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत असून, जिल्ह्यात बाधितांची संख्या ७८५६ इतकी आहे. तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या २४०० आहे व २२५ रूग्ण दगावले आहेत. जिल्ह्याचा मृत्युदर ३ टक्क्यांच्या जवळपास आहे.
पालकमंत्री या नात्याने वारंवार आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेऊन मार्गदर्शन करणे व प्रशासनाला सूचना करणे गरजेचे आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला येऊन बैठक घेतली तशी मराठवाडा मुक्तिदिनाच्या पूर्वसंध्येल येऊन घेणार असाल. मात्र, जिल्ह्यातील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली परिस्थिती पाहता पुण्याच्या धर्तीवर आठवड्याला बैठक घ्यावी. शक्य होत नसेल तर किमान १५ दिवसाला लोकप्रतिनिधी व प्रशासना समवेत बैठक घ्यावी व जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी वरील सर्व अनुषंगिक बाबींची पूर्तता व सुधारणा होण्यासाठी प्रशासनाला कडक सूचना कराव्यात. अंमलबजावणीकडे नजर ठेवावी ही आग्रहाची मागणी पाटील यांनी पालकमंत्री गडाख यांच्याकडे केली आहे.
 
Top