उस्मानाबाद / प्रतिनिधी -
 सध्या राजकारणापेक्षा कोरोना विरूध्दच्या लढाईला अधिक महत्व असून मृत्युदर कमी करणे हेच उद्दिष्ट असल्याचे उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख म्हणाले. आज वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला भेट दिल्यानंतर कळंब येथील कोवीड सेंटरला पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी भेट दिली. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे – पाटील, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ – मुंडे, उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, नायब तहसिलदार अस्लम जमादार, वैद्यकीय अधिक्षक डॉ. जीवन वायदंडे, डॉ. स्वप्नील शिंदे यांची उपस्थिती होती.
यावेळी त्यांनी या केंद्रातील रुग्णांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या तसेच त्या तात्काळ सोडविण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच आरोग्य विभागाचे काम योग्य रित्या चालू असून रुग्णांवर व्यवस्थित उपचार होत आहेत. जिल्हा प्रशासन देखील वेळी योग्य निर्णय घेतात असे सांगत गडाख यांनी उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी जनतेच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले. जनतेचा जिव महत्वाचा असून प्रशासन आरोग्य यंत्रणा चांगल्या पद्धतीने काम करत असल्याचे सांगितले.
या नंतर पत्रकाराशी बोलताना पालकमंत्री गडाख म्हणाले की, सध्या राजकारणापेक्षा कोरोनाला हरविण्याला आम्ही प्राधान्य देतो. जिल्ह्यातील वाढता मृत्युदर कमी करण्याचे कशोशीचे प्रयत्न सुरू आहेत, नागरिकांचा जीव महत्वाचा आहे. यासाठी प्रशासन जे निर्णय घेतात ते योग्य आहेत.
उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यांना काउंन्सलींग करुन त्यांच्या रॅपिडअँटीजेन टेस्ट करून घ्याव्यात. त्यांना धिर देण्यासाठी फोनद्वारे संपर्क साधुन मनोबल वाढवीण्यासाठी शिक्षकांच्या नियुक्त्या करा तसेच रूग्णांना दररोज अंडी देण्याचे आदेश खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिले.

बीड जिल्ह्यात कोविड रूग्णांसाठी देण्यात येणारा आहार आपल्या येथील रुग्णांना देण्यात यावा जेणे करून रुग्णांचे आरोग्य सदृढ होईल, अशा सुचना आमदार कैलास घाडगे – पाटील यांनी प्रशासनाला दिल्या
 
Top