उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणार्‍या NEET प्रवेश परीक्षेसाठी उस्मानाबाद येथे प्रवेश परीक्षा केंद्र सुरू करण्याबाबत केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे विनंती करण्याची मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे.
राज्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून आजही अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लागू आहे. विद्यार्थ्यांचा प्रवास टाळण्यासाठी राज्य सरकारने यावर्षीच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या शहरातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा (NEET) सप्टेंबर मध्ये घेण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे. उस्मानाबाद येथे परीक्षा केंद्र नसल्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी सोलापूर अथवा लातूर येथील केंद्राची निवड करावी लागते. परंतु या दोन्ही शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी उस्मानाबाद येथे प्रवेश परीक्षा केंद्र सुरू करण्याची मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे केली होती. या वर्षी उस्मानाबाद ला परीक्षा केंद्र न दिल्यास नाईलाजास्तव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सोलापूर अथवा लातूर येथे परीक्षेसाठी जावे लागेल व यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना संसर्गाचा मोठा धोका संभवतो.
त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद येथे NEET परीक्षेचे केंद्र मंजूर करण्याची विनंती राज्याच्या वतीने केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे करावी, अशी विनंती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्य मंत्री अमित देशमुख  यांच्याकडे केली आहे.

 
Top