बेंबळी येथील गणपती गाडे यांच्या शेतातील पाडवांची पूजा
उस्मानाबाबाद/प्रतिनिधी-
 काळ्याआईची मनोभावे विधीवत पुजा करून तालुक्यातील असंख्य शेतकरी कुटुंबांनी  वेळा अमावस्या बुधवारी (दि. 25 ) उत्साहाने साजरी केली. दरम्यान यंदा रब्बीच्या पेरण्या उशीरा झाल्याने पिकांचा बहार आणखी वाढला नाही. शेेतक-यांनी उत्पन्नाची आशा बाळगत पारंपारिक पद्धतीने काळ्याआईची सहकुटुंब पुजा केली. दुपारी एकनंतर शेतक-यांनी नातेवाईक मित्रपरिवारासह वन भोजनाचा आनंद घेतला.
शेती व्यवसाय हा प्रमुख उदरनिर्वाहाचा पर्याय असल्याने शेतीत वर्षभर काबाडकष्ट करून मिळेल तेवढ्या उत्पन्नात समाधानी असलेल्या शेतकरी कुटुंबासाठी वेळा अमावस्याचा सण एक पर्वणीच असते. यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडवली होती. परिणामी रब्बीची पेरणी उशीरा सुरू झाली. सध्या कांही शिवारात ओलीताखालील पिके बहरात आलेे असले तरी पिकांवरील किड, अळीचे विघ्न दुर करण्याचा खटापोट करावा लागतोय. वेळा अमावस्या असल्याने शहरात अघोषित संचारबंदी असतेच त्यात यंदाची अमावस्या नाताळ सणाच्या दिवशी आल्याने शासकिय, निमशासकिय कार्यालय व बँका बंद होत्या. शाळांना सुट्टी असल्याने बच्चे कंपनीला शेत- शिवारात मौजमजा करण्याला जणू संधीच मिळाली होती. अमावस्याच्या पुजेसाठी व विविध खाद्यपदार्थाच्या तयारीसाठी शेतकरी कुटुंबात मंगळवारपासुनच (दि.23) तयारी सुरू होती.
ही आहे पद्धत
बुधवारी सकाळी सहा पासुन सर्वप्रथम ज्वारीच्या पीठ, दह्यापासुन तयार केलेल्या अंबिलाचे मडके घेऊन शेतकरी शेत शिवारात जात असल्याने चित्र दिसत होते. डोक्यावर घोंगडे पांघरून, अंबिलाच्या मडक्याला कारभारणीचं मंगळसूत्र घालुन पायी चालत शेतकरी पांडव पुजेच्या कोपीत मडक ठेवतो. आता दळणवळणाची साधने वाढल्याने ब-याच शेतकरी कुटुंबातील व्यक्ती मडक्याचा प्रवास वहानातुन करीत असल्याचेही चित्र दिसून आले. बैलांना सजवुन बैलगाडीतुन सहकुटुंब शेताकडे जाण्याची मजा औरच असते. अजुनही बरेच शेतकरी कुटुंब बैलगाडीतुन वेळ अमावस्येला जाण्याची प्रथा कायम ठेवली आहे. आता दुचाकी, चारचाकी व ट्रॅक्टरमधुनही शेताकडे शेतकरी कुटुंब जात असल्याचे चित्र दिसून आले. दुपारी बारानंतर शेतकरी कुटुंबांनी पाच पांडवाची विधीवत पुजा केली, त्यानंतर शेतातील ज्वारी, हरभरा पिकावर अंबिल शिंपडण्यात आले. ज्वारी, हरभरा, गहू , करडई पिकाच्या हिरवाईत बच्चे कंपनी मनसोक्त खेळाचा आनंद घेतला. वनभोजनानंतर कडवट- अंबट बोरं, हिरव्या चिंचा आणि मधमाश्यांनी संकलित केलेल्या मकरंदाचा आस्वाद चिमूूकल्यांनी घेतला.
जेवणाचा मेनू
बाजरीपासुन बनविलेले उंडे, बाजरी व ज्वारीच्या कडक भाकरी तसेच सर्व प्रकारच्या पालेभाज्या, वटाणा, हरभऱ्याचे हिरवे दाणे, बेसन यापासुन बनविलेली भाजी (भज्जी), वांगे, कांद्याची पात व हिरव्या मिरच्यापासुन तयार केलेले भरीत, गव्हाची खीर, कोंदीच्या गोड पोळ्या, आंबट भात (खिचडा) या विविध ताकदवर्धक पदार्थासह अंबिलाचा घोट घेत दुपारी साडेबारानंतर शेत शिवारात वनभोजनाचा शेतकरी कुटुंब व मित्रपरिवारांनी मनसोक्त स्वाद घेतला. उत्तरपूजेनंतर गवताच्या पेंड्या पेटवून शेत शिवारात फिरवण्यात आल्या. सांयकाळी शिवारातील लोंढा गावाकडे परतत असल्याचे चित्र दिसून आले.
 
Top