धाराशिव (प्रतिनिधी)- न्यायालयीन प्रकरणांचा सामंजस्याने निपटारा करण्यासाठी येणाऱ्या पक्षकारांना आता शासनाच्या आरोग्य योजनेचाही थेट लाभ मिळणार आहे.जिल्हा न्यायालय,उस्मानाबाद येथे 12 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित ‘राष्ट्रीय लोक अदालती'चे औचित्य साधून उपस्थित पक्षकारांना ‘आयुष्मान भारत कार्ड'चे वाटप करण्यात येणार आहे.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,उस्मानाबाद आणि जिल्हा शासकीय रुग्णालय, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती. अभिश्री देव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोक अदालत आणि आयुष्मान भारत कार्ड वाटप करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये उपस्थित राहणाऱ्या पक्षकारांना त्यांच्या प्रलंबित तसेच वादपूर्व प्रकरणांचा निपटारा करण्याची संधी मिळणार आहे.त्याचबरोबर त्यांना शासनाच्या आरोग्य योजनेचा थेट लाभ मिळावा,या उद्देशाने आयुष्मान भारत कार्ड वाटपाचा उपक्रम लोक अदालतीशी जोडण्यात आला आहे.त्यामुळे न्यायालयीन प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी येणाऱ्या पात्र पक्षकारांना एकाच ठिकाणी आरोग्य योजनेशी जोडण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे.
न्यायालयीन वाद मिटविण्याबरोबरच नागरिकांना आरोग्य सुरक्षेच्या योजनेचा लाभ मिळवून देणारा हा संयुक्त उपक्रम असल्याने संबंधित पक्षकारांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
12 सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होऊन प्रलंबित व वादपूर्व प्रकरणांच्या निपटाऱ्याची संधी साधावी तसेच आयुष्मान भारत कार्ड वाटप उपक्रमाचाही लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती. भाग्यश्री पाटील आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर यांनी केले आहे.