धाराशिव (प्रतिनिधी)- आनंदनगर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील ३० वर्षीय महिलेवर गावातील एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून सन २०२३ पासून लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार समोर आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने २१ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या प्रथम खबरीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाने पीडित महिलेला “तू मला खूप आवडतेस, मी तुझ्याशी लग्न करेन तसेच तुझ्या दोन्ही मुलींचा सांभाळ करेन,” असे सांगून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच या घटनेचे छायाचित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देत पीडित महिला व तिच्या दोन्ही मुलींना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील कलम ६४, ११५(२), ३५१(२) व ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास आनंदनगर पोलीस करीत आहेत.