धाराशिव (प्रतिनिधी)-  परंडा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध शासकीय कामांचा तातडीने निपटारा व्हावा आणि शासनाच्या योजना थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात,या उद्देशाने भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघस्तरीय ‌‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' शनिवारी 1 ऑगस्ट रोजी रामहारी मंगल कार्यालय,नगर रोड,भूम येथे उत्साहात पार पडले.या शिबिराच्या माध्यमातून विविध योजनांचा 4 हजार 459 लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात आला.तर विविध योजनेचा लाभ मिळण्यासाठी 143 लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात आले.

कार्यक्रमास भूमच्या नगराध्यक्षा संयोगीता गाढवे, भूम पंचायत समितीच्या सभापती पूजा ढगे, जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्री काळे व विजयमाला मारकड, पंचायत समिती सदस्या श्रीलता लोखंडे,उपविभागीय अधिकारी ज्योती चौहान यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले तसेच थोर पुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून शिबिरास सुरुवात झाली.

यावेळी बोलताना नगराध्यक्षा संयोगीता गाढवे म्हणाल्या, प्रशासन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत असल्यास शासकीय योजनांचा लाभ योग्य पद्धतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो. ‌‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' अंतर्गत आयोजित समाधान व महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा थेट लाभ मिळत असून,शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रभावी उपक्रम आहे.या शिबिरातून विविध योजनांचा 4 हजार 459 लाभार्थ्यांना थेट लाभ देता आल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.

शिबिरामध्ये नगर परिषद,आरोग्य विभाग,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,भूमी अभिलेख, वन विभाग,महिला व बाल विकास विभाग,एकात्मिक बाल विकास सेवा योजना,तालुका कृषी अधिकारी कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय,आरटीओ/वाहतूक शाखा,पोलीस विभाग, जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ,पोस्ट कार्यालय,राज्य मार्ग परिवहन महामंडळ,स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच तहसील कार्यालय आदी विभागांनी सक्रिय सहभाग नोंदविला.विविध शासकीय योजनांची माहिती,प्रत्यक्ष लाभ तसेच अर्ज स्वीकारण्याची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली.

शासनाच्या विविध विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांच्या दारी शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त करत या उपक्रमाचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूमचे तहसीलदार जयवंत पाटील यांनी केले,तर परंडा तहसीलदार निलेश काकडे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

 
Top