धाराशिव (प्रतिनिधी)- नाटकामुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक होतो. विविध अनुभवांमुळे माणूस अधिक समजूतदार आणि सहानुभूतीशील बनतो. त्यामुळे नाटक हे मानवी जीवन समृद्ध करणारे एक महत्त्वाचे कला माध्यम असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते नितीन दंडुके यांनी केले.
धाराशिव शहरात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा धाराशिव आयोजित राज्यस्तरीय गंगाधर करंडक स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे शुक्रवार 27 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता उदघाटन संपन्न झाले.
यावेळी ज्येष्ठ अभिनेते प्रशांत तपस्वी, नाट्य रंगकर्मी अश्विनी तडवळकर , अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कार्यकारीणी सदस्य विशाल शिंगाडे, डॉ.गणेश शिंदे,डी. जी.कुलकर्णी, रोहित कुलकर्णी, सुगत सोनवणे, सारीपुत शिंगाडे, यांच्या सह अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा धाराशिवच्या पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
पुढे बोलताना नितीन दंडुके म्हणाले की, नाटक हे मानवी जीवनाचे प्रतिबिंब मानले जाते. ते केवळ मनोरंजनाचे साधन नसून व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे. नाटकामुळे व्यक्तीला आपल्या भावना मुक्तपणे व्यक्त करता येतात, त्यामुळे मानसिक ताण कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ अभिनेते प्रशांत तपस्वी म्हणाले की, अशा स्पर्धांमुळे स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध होते. रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळून त्यांची प्रगती साधली जाते. नाटकातून समाजातील समस्या, संस्कृती आणि मूल्यांची जाणीव होऊन व्यक्ती अधिक संवेदनशील बनत असल्याचे त्यांनी सांगितले.
स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर सोलापूर येथील वैभव दीप नाट्य संस्थेची प्रेम की यातना ही एकांकिका सादर करण्यात आली. या नाटकात जैद हसन, सई दरेकर,प्रतीक तांदळे यांनी भूमिका साकारल्या.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक आयोजक विशाल शिंगाडे, सूत्रसंचलन डी. जी.कुलकर्णी यांनी केले. तर आभार शशिकांत माने यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ताहेर शेख, विजय उंबरे, अविनाश बनसोडे , यशवंत शिंगाडे, सुमित शिंगाडे,प्रदीप गायकवाड, भैरू कसबे, सुरेश देवकुळे,प्रमोद जोगदंड,दिशा सोनटकके, रिया राठोड, प्रवीण सोनवणे, प्रियांका पोतदार, रिया राठोड यांच्या सह शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. नाटक पाहण्यासाठी शहर व परिसरातील नाट्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.