धाराशिव (प्रतिनिधी)- आयुष्यमान भारत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,धाराशिव यांनी उल्लेखनीय कामगिरी करत नविन वैद्यकीय महाविद्यालयांच्या तुलनेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.या योजनेअंतर्गत गेल्या तीन वर्षांत एकूण 2,483 रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले असून शासनाकडे तब्बल 3 कोटी 74 लाख 25 हजार 211 रुपये इतकी विमा रक्कम जमा झाली आहे.
या योजनेतर्गत सन 2023 मध्ये 861 रुग्णांवर,सन 2024 मध्ये 1,050 रुग्णांवर तर सन 2025 मध्ये लक्षणीय वाढ होऊन एकूण 2,483 रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले.ही आकडेवारी नविन वैद्यकीय महाविद्यालयांपैकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,धाराशिव यांची असून रुग्णालयाच्या कार्यक्षम व्यवस्थापनाचे द्योतक आहे.
या यशामागे अधिष्ठाता डॉ.शैलेन्द्र चौहान यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय अधीक्षक डॉ.तानाजी लाकाळ, डॉ.स्मिता गवळी व अधिसेविका यांचे काटेकोर नियोजन, प्रशासन व समन्वय महत्त्वाचा ठरला.अधिष्ठाता यांच्या नेतृत्वाखाली मागील वर्षात 2,483 रुग्णांना या योजनेचा मोफत लाभ मिळाला.
मेडिसीन, सर्जरी, बालरोग, अस्थिरोग, स्त्रीरोग, नेत्ररोग, ईएनटी, ॲनस्थेसिया, रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी, बायोकेमिस्ट्री व मायक्रोबायोलॉजी या सर्व विभागांचे या यशात मोलाचे सहकार्य लाभले. तसेच विभाग प्रमुख डॉ. प्रविणकुमार गोवंदे,निवासी वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय समन्वयक डॉ. दत्ता चौरे व डॉ.साजीद शेख, डेटा एन्ट्री ऑपरेटर सत्यजित मुळे, सदाशिव कांबळे व सारिका शिंगाडे,तसेच आरोग्य मित्र व स्टाफ नर्सेस यांनी सातत्याने मेहनत घेतली. योजनेचे प्रमुख डॉ.ओमप्रकाश शेटे यांच्या मार्गदर्शनामुळे ही योजना अधिक प्रभावीपणे सामान्य रुग्णांपर्यंत पोहोचली.सध्यस्थितीत रुग्णालयात आधुनिक उपचार यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यात आली असून प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स,नियमित वैद्यकीय अधिकारी यांच्या माध्यमातून दररोज रुग्ण तपासणी व उपचार समाधानकारक पद्धतीने सुरू आहेत.
रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून उपचारांबाबत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.सामाजिक व आरोग्यविषयक कार्यक्रमांमध्येही रुग्णालयाचा उत्स्फूर्त सहभाग असून समाजात आरोग्यविषयक जनजागृतीत रुग्णालयाची महत्त्वाची भूमिका आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,धाराशिव येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
जिल्ह्यासह आजूबाजूच्या परिसरातून शस्त्रक्रिया व विविध आजारांवरील उपचारासाठी मोठ्या संख्येने रुग्ण येथे दाखल होत आहेत.उपलब्ध साधनसामग्री व मनुष्यबळाचे योग्य नियोजन करून रुग्णालय व्यवस्थापन रुग्णांना मोफत सेवा देण्यासाठी सतत कार्यरत आहे.शासनाच्या योजनांचा लाभ रुग्णांना सहज मिळावा यासाठी यंत्रणा सदैव सतर्क ठेवून योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जात आहेत.यामुळेच नविन असले तरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,धाराशिव हे कार्यक्षमतेत अव्वल ठरले आहे.