धाराशिव (प्रतिनिधी)- 11 वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन 1 मार्च ऐवजी 29 मार्चला पळसप तालुका धाराशिव येथे होणार आहे अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिक्षक आमदार विक्रम वसंतराव काळे यांनी दिली.
मराठवाड्याचे सुपुत्र शिक्षण महर्षी वसंतराव काळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी 2 फेब्रुवारी रोजी एकदिवशीय मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन घेण्यात येते. परंतु 28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लोकनेते अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यामुळे हे संमेलन 1 मार्च 2026 रोजी घेण्याचे ठरले होते. साहित्य संमेलनाची संपूर्ण तयारी संयोजन समितीने पूर्ण केलेली होती. परंतु आ.विक्रम काळे यांच्या काकीचे निधन झाल्याने हे साहित्य संमेलन 29 मार्च 2026 रोजी रविवारी घेण्यात येणार आहे. या बदलाची मराठवाड्यातील सर्व साहित्यिक, रसिक तसेच काळे परिवारावर प्रेम करणाऱ्या मराठवाड्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी नोंद घ्यावी असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार विक्रम वसंतराव काळे यांनी केले आहे.