धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्ह्यात झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि नागरिकांवर मोठे संकट आले आहे. शेतीसह व्यापार व्यवहार आणि समाजजीवनावर नकारात्मक परिणाम झाला असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. याअनुषंगाने भाजपकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. भाजपच्या वतीने सोमवारी दि.29 रोजी देण्यात आलेल्या निवेदनात मातोश्री शेत रस्ते व पाणंद रस्ते योजना तसेच मनरेगा अंतर्गत मंजूर झालेल्या कामांतर्गत स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध होऊ शकते, असे नमूद करण्यात आले आहे. या योजनांतील शेत रस्ते व पाणंद रस्ते खडीकरणाची कामे थेट स्थानिक सुशिक्षित बेरोजगार अभियंते, महिला संस्था, महिला बचत गट व शेतकरी बचत गटांना देण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली. यामुळे पूरपरिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल तसेच बेरोजगार युवक आणि महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असेही निवेदनात नमूद आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावास सकारात्मक दृष्टीकोनातून विचार करून तात्काळ निर्णय घ्यावा, अशी विनंती भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली. या निवेदनावर भाजप जिल्हा सरचिटणीस ॲड. नितीन भोसले आणि कळंब तालुकाध्यक्ष मकरंद पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top