धाराशिव (प्रतिनिधी)- दोन महिने ज्या वीजग्राहकांचे वीज देयक थकेल त्यांच्या सुरक्षा ठेवीतून थकबाकीची रक्कम कपात केली जाईल, असा नवीन नियम महावितरणने जुलैपासून लागू केला आहे. त्यामुळे थकबाकीदार वीजग्राहकांनी नियमीतपणे दरमहा वीज देयक भरावे असे आवाहन महावितरणने केले आहे.
सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडे वीज देयकाची थकबाकी प्रत्येक वर्षी वाढत आहे. यामुळे महावितरण कंपनी आर्थिक अडचणीत सापडली आहे. त्यामुळे आता सलग दोन महिन्यांचे वीज देयक थकल्यास तिसऱ्या महिन्यात वीज ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीतून थकबाकीची रक्कम कपात केली जाणार आहे. ही रक्कम एकदा कपात झाली की नंतर वीज ग्राहकाला प्रथम सुरक्षा ठेवीची रक्कम व त्यानंतर देयकातील इतर शिल्लक रक्कम भरणे बंधनकारक असेल. महावितरणकडून प्रत्येक वर्षी वाढीव वीज देयकानुसार पाठवले जात असलेल्या सुरक्षा ठेवीची रक्कम ज्या ग्राहकांनी भरली नसेल त्याला ही संपूर्ण रक्कम भरावी लागेल. त्यानंतरच संबंधित ग्राहकाचे शिल्लक देयक भरता येईल. ही रक्कम न भरल्यास ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला जाईल. त्यानंतर ग्राहकाला पुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी सुरक्षा ठेव, देयकाची थकबाकी भरावी लागेल. वीज जोडणी शुल्क भरूनच वीज जोडणी पूर्ववत करता येऊ शकेल.
हा नियम लागू होण्यापूर्वी दोन महिन्यांचे देयक थकल्यास तिसऱ्या महिन्यात पंधरा दिवसांची नोटीस दिली जात होती. त्यानंतरही देयक नभरल्यास वीजपुरवठा तात्पुरता खंडित केला जात होता. कायम वीजपुरवठा खंडित झाल्यावर मात्र सुरक्षा ठेवीतील रक्कम थकबाकीतून वळती केली जात होती.
महावितरण सातत्याने एसएमएस, ईमेल तसेच मोबाईल व्दारे संपर्क करत थकीत वीज बील भरण्याबाबत वीजग्राहकांना अवगत करत असते. मात्र या ना त्या कारणांमुळे बील भरण्यास ग्राहक टाळाटाळ करतात परिणामी वीजपुरवठा खंडीत करण्याची कटू कारवाई करावी लागते. मात्र आता दोन महिन्याच्यावर थकबाकी राहील्यास थकीत बीलाची रक्कम सुरक्षा ठेवीच्या रकमेतून कपात करण्यात येत आहे. सोबतच सुरक्षा ठेव बीलातून वजा जाता उर्वरीत वीजबील नवीन सुरक्षा ठेवीच्या रकमेसह वीजबील स्विकारत आहे.