भूम(प्रतिनिधी)-उत्तराखंडमधील प्रेमनगर आश्रम राणीपूर, हरिद्वार येथे 28 जून ते 1 जुलै दरम्यान होणाऱ्या पहिल्या 18 वर्षांखालील राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी स्वराज क्रीडा मंडळाचा अष्टपैलू खेळाडू स्वराज मुळे याची महाराष्ट्र राज्य कबड्डी संघात निवड झाली आहे. स्वराज अश्रू मुळे यांचे राष्ट्रीय स्तरावर भरारी घेणे शक्य झाले, ते फक्त अमर सुपेकर च्या योग्य मार्गदर्शनामुळेच! अनेक अदृश्य अडथळ्यांची शर्यत पार करत त्याने ही निवड सार्थ ठरवली आहे. त्याच्या या यशाबद्दल स्वराज क्रीडा मंडळाच्यावतीने त्याचे अभिनंदन करण्यात आले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
या यशामागे कबड्डी कोच अमर सुपेकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच निलेश व्हरे, गणेश सुपेकर, अक्षय बाराते, स्वप्निल सुपेकर यांचेही मार्गदर्शन त्याला मिळाले. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह महादेव साठे व धाराशिव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण मोहीते यांनीदेखील स्वराज मुळे याचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. स्वराज मुळे याची ही निवड भूम परिसरातील कबड्डीप्रेमींसाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे. महाराष्ट्र कबड्डी संघात निवड झालेल्या स्वराज मुळे याची आई भूम आगारात वाहक म्हणून काम करत आहे. आगारात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मुलाचा महाराष्ट्र कबड्डी संघात प्रवेश झाल्याने भूम आगाराच्या वतीने अभिनंदन होत आहे.