भूम (प्रतिनिधी)-  वाशी सेरेंटीका व रिनिवल पावर कंपनीकडून शेतक-यांना योग्य मावेजा न देता आर्थिक फसवणुक होत असल्यामुळे तालुक्यातील तांदुळवाडी येथील शेतक-यांनी दि. 25 जून रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा ईशारा दि. 19 जून रोजी वाशीचे तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांना निवेदनाद्वारे देण्यात आला होता. मात्र प्रशासनाकडून कसलीही दखल न घेतल्यामुळे तांदुळवाडी येथील वीस शेतकरी दि. 25 जून रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. उपोषणाचा आज दि. 27 जून रोजी तिसरा दिवस आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी वाशी तालुक्यातील अनेक गावातील महिला पॉवर कंपनीचे कामे बंद करा या मागणीसाठी तहसीलदार यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.

तांदुळवाडी शिवारात सेरेंटीका व रिनिवल पावर कंपनीचे पवनचक्क्की उभारणी तसेच 220 के. व्ही. पॉवरच्या लाईनची कामे सुरू आहेत. ही कामे करताना शिवारातील फळझाडे व इतर झाडे यांची विनापरवानगी बेशुमार कत्तल केली आहे. रिनिवल पॉवर व सरेंटीका पॉवरने 220 के व्ही चे खांब उभा करताना सांगितलेला मावेजा व तार ओढताना सांगितलेला मावेजा असा कोणताही मोबदला दिलेला नसून ही कामे करण्यासाठी कंपनीची मनमानी व गुंडांकडून शेतक-यांना धमकावले जात असल्याचा आरोप शेतक-यांकडून होत आहे. कंपनीकडून योग्य मावेजा द्यावा या व इतर मागण्यासाठी वीस शेतकरी आमरण उपोषणास बसलेले असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रशासनाच्या कोणत्याही अधिका-यांनी उपोषणकर्त्यांना भेट दिली नसल्याचे सांगितले. उपोषणास बसलेल्या तालुक्यातील तांदुळवाडी येथील उपोषण करते शेतकऱ्यांची आज माजी आमदार राहुल मोटे यांनी भेट घेऊन याबाबत धाराशिव जिल्हाधिकारी यांच्याबरोबर दूरध्वनी द्वारे चर्चा करून यावर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी करून सदर उपोषणकर्त्याबरोबर आपण असल्याची ग्वाही दिली.

 
Top