धाराशिव (प्रतिनिधी)-  सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाचे 11 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, संकल्प ते सिद्धी अभियानाच्या अनुषंगाने कळंब येथे सोमवारी दि.23 जून रोजी विकसित भारत संकल्प मेळावा कळंब येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीच्या कार्यसंस्कृतीचा प्रभाव पडलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात पक्ष प्रवेश केला. 

दरम्यान मेळाव्याची सुरुवात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. त्यानंतर कार्यक्रमात नवनियुक्त मंडळ अध्यक्ष मकरंद पाटील, अरुण चौधरी आणि दत्तात्रय साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना लक्षात घेता भाजपची संघटनात्मक रचना कशी असावी, याविषयी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. तसेच भाजप कार्यकर्त्यांच्या बळावर आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करेल. असा विश्वास जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी व्यक्त केला. 

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांची उपस्थिती होती. या मेळाव्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष दामोदर शिंदे आणि काँग्रेसचे तालुका सचिव सुदर्शन देशमुख यांनी अनेक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करून पक्षाला अधिक बळ दिले. याशिवाय अमोल लोहार, बापूराव चव्हाण, सरगम आडे, दत्ता खांडेकर, मुकेश कांबळे, किशोर पाटोळे, विजय राऊत आदी कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले. यावेळी विकास बारकुल, रामहरी शिंदे, संजय पाटील तसेच तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top