तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील काटगाव येथील सरपंच अशोक दगडू माळी यांना ग्रामपंचायत कारभारातील अनियमितते बाबतीत अपाञ ठरवुन अजुन ही ग्रामपंचायत कारभार सुधरावयाचे नाव घेत नाही. येथील रस्ते, नाल्या स्वच्छतेकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत असल्याने पावसाळ्यात साथरोग पसरण्याची शक्यता असल्याने तातडीने गावात स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.
या आधीच या ग्रामपंचायतचा भष्ट्र कारभार चव्हाट्यावर येवुन सरपंच अशोक माळी यांना बडतर्फ करण्यात आले. तरीही या गावचा कारभार सुधारण्याचे नाव घेत नाही. या गावात करण्यात आलेले कोट्यावधी रुपयाचे कामे निकृष्ट दर्जाची केली गेल्याने याचा फटका याचा ग्रामस्थांना बसत आहे. येथील विकास कामांची गुणनियञंण पथकामार्फत तपासणी करुन, दोषी अंती संबंधितावर कारवाईची मागणी होत आहे.
तुळजापूर तालुक्यातील काटगाव हे दहा हजार लोकवस्तीचे मराठवाड्यातील शेवटचे गाव आहे. सध्या गावातील गटारींची स्थिती अत्यंत गंभीर आहे. गटारी थेट लोकांच्या दरवाजासमोर असल्यामुळे लहान मुले, वृद्ध यांना अपघाताचा धोका आहे. तसेच गटारीतील साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरली आहे आणि डासांची संख्या वाढली आहे. यामुळे साथीचे आजार पसरण्याची मोठी शक्यता आहे. गावात गटारी उघड्या ठेवल्या आहेत. कामे अर्धवट ठेवले आहेत. त्या झाकले नाही काम पूर्ण झाले आहे म्हणून बिल काढण्याच्या मागे गुत्तेदार लागला आहे. ग्रामपंचायतीवर आरोग्य व स्वच्छता राखण्याची जबाबदारी आहे. त्यासाठी गटारींची नियमित साफसफाई, औषध फवारणी व सांडपाणी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. माञ या समस्यांकडे ग्रामपंचायत लक्ष देण्यास तयार नाही. काटगाव घट्टेवाडी ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. घट्टेवाडी भागाकडे ग्रामपंचायत कारभारी सापत्न भावाने बघत आहेत. स्वच्छतेची परिस्थिती अशीच राहीली तर गावकऱ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. काटगावात स्वच्छते बाबतीत बोंबाबोंब असल्याने स्वच्छतेसाठी खर्ची दाखवलेला पैसा जातो कुठे असा प्रश्न विचारला जातो आहे. ग्रामपंचायत स्वच्छते बाबतीत लक्ष देत नसल्याने आता वरिष्टांनीच यात लक्ष घालण्याची मागणी होत आहे.