धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात विविध पवन व सौर ऊर्जा निर्मिती कंपन्या ऊर्जा निर्माण करण्याचे काम करत आहे. या कंपन्यांनी आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून जिल्ह्यातील आठही तालुक्यात प्रत्येकी एक गाव संपूर्ण सौर ऊर्जेचा वापर करणारे सौर ग्राम तयार करावे व या पावसाळ्यात जिल्ह्यात ५० लक्ष वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये सहभागी होऊन वृक्षलागवडीसाठी पुढाकार घ्यावा.असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच जिल्ह्यात पवन व सौर ऊर्जा निर्माण करणाऱ्या कंपन्यांची सौर ऊर्जा ग्राम आणि ५० लक्ष वृक्ष लागवडीबाबत आयोजित बैठकीत श्री.पुजार बोलत होते.यावेळी अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर,जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम गोडभरले,जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक चिन्मय दास,महावितरणचे लातूर परिमंडळचे मुख्य अभियंता श्री.गुरनुले,अधीक्षक अभियंता श्री.आडे, कार्यकारी अभियंता श्रीमती.कुळकर्णी तसेच विविध पवन व सौर ऊर्जा निर्मिती कंपन्याचे व्यवस्थापक उपस्थित होते.
श्री.पुजार पुढे म्हणाले की,पवन ऊर्जा कंपन्यांशी काही स्थानिक प्रश्न आहेत.त्या प्रश्नांची जाणीवपूर्वक सोडवणूक केली पाहिजे.संबंधित शेतकरी व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन उर्जा निर्मितीचे काम प्रभावीपणे करावे.पवन व सौर ऊर्जा निर्मिती कंपन्यांनी या व्यतिरिक्त आपल्या परिसरातील शाळा व सार्वजनिक संस्थांना उर्जेतून परिपुर्ण करावे.असे ते म्हणाले.
विविध संघटना व सेवाभावी संस्थांना सोबत घेऊन १९ जुलै रोजी जिल्ह्यात १५ लक्ष वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगून श्री.पुजार म्हणाले की, कोणत्या ठिकाणी वृक्ष लागवड करायची आहे हे कंपन्यांनी निश्चित करावे.१ हजार रोपांची लागवड करावी किंवा घनवन अर्थात मियावाकी पद्धतीने लागवड करावी. या उपक्रमात सर्व पवन व सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन देखील श्री.पुजार यांनी यावेळी केले.
सभेला उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सौर ऊर्जा ग्राम आणि वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होणार असल्याची ग्वाही यावेळी दिली.