धाराशिव (प्रतिनिधी)- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षी साजरा होणारा सामाजिक न्याय दिन यंदाही जिल्ह्यात जिल्हास्तर, तालुकास्तर व गावपातळीवर विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा केला जाणार आहे.
या निमित्ताने 26 जून रोजी सकाळी 8 वाजता जिल्हास्तरावर समता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. दिंडीचे उद्घाटन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष,जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या हस्ते होणार आहे.या दिंडीमध्ये महाविद्यालयीन, माध्यमिक शाळांतील विद्यार्थी, एन.सी.सी., एन.एस.एस., तसेच स्काऊट-गाईडचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
समता दिंडी मल्टीपर्पज हायस्कूल येथून सुरू होऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून यशवंतराव चव्हाण सभागृहात समाप्त होणार आहे.यानंतर दुपारी 12 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,धाराशिव येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याला जिल्हाधिकारी श्री.पुजार अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.
कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण, तसेच अनुसूचित जातीमधील गुणवंत विद्यार्थ्यांना गुणवत्ता पुरस्कार, शिष्यवृत्ती,आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत निबंध व वक्तृत्व स्पर्धा,सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती,तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येणार आहे.तसेच तालुकास्तरावरही असेच उपक्रम गटविकास अधिकारी,तहसीलदार आणि गटशिक्षणाधिकारी यांच्या समन्वयातून राबवले जातील.