भूम (प्रतिनिधी)-  भूम शहरात अमृत-2 योजनेतून प्रत्येकाच्या नळाला मीटर बसवण्याच्या प्रक्रियेला सर्वपक्षीयकडून कडाडून विरोध होत आहे. प्रशासनाने मीटर बसवण्याच्या प्रक्रियेला स्थगिती द्यावी. या मागणीसाठी गाव बंद ठेवून मोर्चा काढून गोलाई चौकात तीव्र चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी मागणीचे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले.

बुधवार दिनांक 25 जून 2025 रोजी भूम शहरातील भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व पक्षाच्यावतीने भूम नगर पालिका चौक, ओंकार चौक, वारदवाडी मार्गाने  गोलाई चौक येथे आल्यानंतर भूम शहर बचाव, नळाचे मीटर हटावच्या घोषणा देत चक्का जाम आंदोलन करण्यात आले. 

यावेळी आज रोजी वार्षिक नळपट्टी 2000 रुपयाच्या जवळपास आहे. ती नळाला मीटर बसवल्यानंतर 6000 रुपये येणार आहे.  ही गोरगरिबांना परवडणारे नाही. सक्तीने नळाला मीटर बसवण्यात येऊ नये. अशी मागणी यावेळी लावून धरली. यावेळी तहसीलदार जयंत रावजी पाटील देखील उपस्थित होते. 

आंदोलनासाठी माजी नगराध्यक्ष विजयसिंह थोरात, भाजप तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा उपप्रमुख दिलीप शाळू महाराज,  तालुका प्रमुख अनिल शेंडगे, काँग्रेस आय पक्ष जिल्हा उपाध्यक्ष विलास शाळू, रुपेश शेंडगे, चंद्रमणी गायकवाड, अमृता गाढवे, उमाताई रंधवे, बाबासाहेब वीर, आबासाहेब मस्कर, शंकर खामकर, विनोद नाईकवाडी, अख्तर जमादार आदिनी पुढाकार घेतला.

 
Top