धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे जिल्हा परिषद आरोग्य विभागातील गुणवंत अधिकारी/कर्मचारी गुणगौरव सोहळा व प्रधानमंत्री मातृत्व अभियानांतर्गत स्त्रीरोगतज्ज्ञ बक्षीस योजना पुरस्कार वितरण कार्यक्रम आज २८ मार्च रोजी संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. चंद्रकांत शिरोळे (सेवानिवृत्त अधिष्ठाता,संचालक MIMSR, लातूर) होते.प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी किर्ती कीरण पुजार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष उपस्थित होते.
जिल्ह्यातील आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल एकूण ५७ जणांची निवड करण्यात आली.यामध्ये प्रथम पुरस्कार २९ अधिकारी कर्मचारी, द्वितीय पुरस्कार २६ अधिकारी,तृतीय पुरस्कार २ कर्मचारी,विशेष नाविन्यपूर्ण कार्य पुरस्कार २ अधिकारी यांना मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
डॉ.चंद्रकांत शिरोळे यांनी कार्यक्रमाच्या भावनिक महत्त्वावर प्रकाश टाकला. जिल्हाधिकारी किर्ती कीरण पुजार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिक डॉ.मैनाक घोष यांनी आरोग्य सेवकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला.तसेच,कॅशलेस उपचार योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी,असे निर्देश दिले.
कार्यक्रमाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ.शैलेन्द्र चव्हाण,जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री.सुनील खमीतकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांनी,सूत्रसंचालन श्री.दौलत निपाणीकर यांनी केले. उपस्थितांचे आभार श्रीमती मनीषा सुकाळे,आरोग्य पर्यवेक्षक यांनी मानले.यावेळी गुणवंत अधिकारी व कर्मचारी यांच्या योगदानाचा सन्मान करून हा सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला.