धाराशिव (प्रतिनिधी)-  नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर 21 ते 23 मार्च 2025 दरम्यान पार पडलेल्या राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत धाराशिवच्या दिव्यांग खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत एकूण 50 पदके पटकाविली.यामध्ये 29 सुवर्ण,13 रौप्य आणि 8 कांस्य पदकांचा समावेश आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार व जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.सत्कार समारंभात जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरावत,तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून सुवर्णपदक विजेत्या 29 खेळाडूंना प्रत्येकी 10 हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.जिल्हा समाज कल्याण अधिकारी खमितकर यांनी प्रास्ताविकात धाराशिव जिल्ह्यात दिव्यांग क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.यामुळे भविष्यात दिव्यांग खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करण्यास मदत होईल.

या स्पर्धेत अस्थिव्यंग विद्यार्थ्यांनी 16 सुवर्ण,8 रौप्य,6 कांस्य असे एकूण 30 पदके,मतिमंद विद्यार्थ्यांनी 8 सुवर्ण,2 रौप्य,1 कांस्य असे एकूण 11 पदके,बहुविकलांग विद्यार्थ्यांनी 5 सुवर्ण,4 रौप्य एकूण 9 पदके पटकाविली. जिल्ह्याने या स्पर्धेत अस्थिव्यंग, मतिमंद आणि बहुविकलांग गटात उपविजेतेपद मिळवत क्रीडाक्षेत्रात भरीव योगदान दिले.कार्यक्रमाला दिव्यांग कल्याण विभागाचे अधिकारी प्रशिक्षक,विजेते खेळाडू आणि सहाय्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top