शेतकऱ्यांना मिळणार विशिष्ट ओळख क्रमांक
: शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेणे होणार सुलभ
धाराशिव दि. कृषि क्षेत्रात व डिजीटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा जलदगतीने परिणामकारकरित्या लाभ देणे सुलभ व्हावे यासाठी राज्यात अॅग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे.या योजनेअंतर्गत प्रत्येक गावात सर्व शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक ( फार्मर आयडी ) तयार करण्यात येत आहे.
जिल्ह्यात १६ डिसेंबरपासून यासाठी मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ मैनक घोष यांनी दिली.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या मोहिमेच्या दिवशी उपस्थित राहून आपला शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करून घ्यावा.असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष यांनी केले आहे.
शेतकरी ओळख क्रमांकामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित फायदा होणार आहे.पीएम किसान योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यकतेच्या अटी पूर्ण करून लाभ प्राप्त करण्यामध्ये सुलभता येणार आहे.यामुळे सर्व पात्र लाभार्थी समाविष्ट करून घेण्यास सहाय्य मिळेल.
पिकासाठी कर्ज मिळण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषि इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्जे उपलब्ध करून घेण्यात सुलभता राहील . पिक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत शेतकऱ्यांचे देय नुकसान भरपाईसाठी सर्वेक्षण करण्यात सुलभता येईल.किमान आधारभूत किंमतीवर खरेदीमध्ये शेतकऱ्यांचे नोंदणीकरण ऑनलाईन पध्दतीने होऊ शकेल.शेतकऱ्यासाठी कृषि कर्ज वित्त,निविष्ठा आणि इतर सेवा देणाऱ्या यंत्रणाना कृषि सेवा सहजपणे उपलब्ध करून देता येईल.
विविध सरकारी योजनांचा लाभ, कृषि व संलग्न विभागांना शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संचच्या उपलब्ध आकडेवारीच्या आधारे योजनांचा लाभ वितरीत करण्यामध्ये सुलभता येणार आहे.तसेच लाभार्थ्यांना वारंवार प्रमाणिकरणाची आवश्यकता राहणार नाही . शेतकऱ्यांना वेळेवर कृषिविषयक सल्ले,विविध संस्थाकडून संपर्क करण्याच्या संधीमध्ये वाढीसह नाविण्यपूर्ण कार्यक्रमांच्या विस्तार व प्रचारात सफलता प्राप्त होणार आहे .
शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचे लाभ प्राप्त करुन घेण्यासाठी आपल्या गावात मोहिमेच्या दिवशी शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करून घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे .
*विविध शासकीय योजनेचा मिळणार लाभ*
शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच यापुढे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना,नमो योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र काढणे आवश्यक आहे.शेतकरी ओळखपत्रावरील असलेल्या विशिष्ट क्रमांकानुसार शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ मिळणार आहे . यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अॅग्रीस्टॅक या अँपवर अर्ज करता येणार आहे.