उमरगा (प्रतिनिधी) - उमरगा तालुक्यातील नागरिकांनी शासकीय योजनांच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी  ई-केवायसी करून घेणे अनिवार्य झाले आहे.गॅस सबसिडी असो वा बँकेत खाते सुरू ठेवायचे असो, केवायसी गरजेचीअसून आता रेशनवरील धान्य पाहिजे असेल तर ई-केवायसी करणे शासनाने अनिवार्य केले आहे. ई-केवायसी नसेल तर मोफत योजनेतील धान्य मिळणार नाही त्या करिता ईकेवायसी लवकर करून घ्यावी असे आवाहन नायब तहसीलदार डॉ.अमित भारती यांनी केले आहे.

ई-केवायसी म्हणजे 'नो यूअर कस्टमर म्हणजेच आपले ग्राहक जाणून घ्या, असा त्याचा अर्थ होतो.त्यामध्ये 'ई' जोडले तर 'इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर अशी त्याची ओळख होते.ही एक डिजिटल प्रक्रिया आहे.अंगठ्याचा किंवा बोटांचा ठसा किंवा डोळ्यांना स्कॅन करून पूर्ण केली जाते.सरकारने रेशन दुकानाच्या माध्यमातून मोफत धान्य,तसेच काही रेशन कार्डधारकांना धान्याऐवजी त्यांचे खात्यावर सबसिडी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.धान्य किंवा सबसिडी नेमक्या त्याच लाभार्थीपर्यंत पोहोचते का, त्याच्या नावावर इतर कोणी या 

योजनेचा गैरफायदा घेतोय, का यासाठी ही ई- केवायसी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  गाव तेथे रेशन दुकान' आहे. या रेशन दुकानदारांना प्रशासनाने जास्तीतजास्त ई-केवायसी पूर्ण करण्याबाबत निर्देश दिले आहेत.त्यासाठी मुदतही निश्चित करण्यात आली आहे.ज्या रेशन कार्डधारकांचे ई-केवायसी पूर्ण होणार नाहीत, त्यांचे धान्य किंवा सबसिडी बंद होऊ शकते,त्यामुळे रेशन दुकानात ई-केवायसी करून घ्यावी.काही लाभार्थी ई-केवायसीपासून अनभिज्ञ असल्याचे दिसत आहे.

रेशन दुकानात करता येते ई-केवायसी

ई-केवायसी म्हणजे काय व ती कोठे करायची,असा प्रश्न अनेक रेशनकार्डधारकांना पडलाय.आपल्या गावातील म्हणजे आपण जेथे रेशनचे धान्य भरून घेतो तेथे बोट लावून ई-केवायसी करावी, अशी माहिती पुरवठा विभागा तून देण्यात आली.


उमरगा तालुक्यात एकूण रेशनकार्ड लाभ धारकांची संख्या एक लाख 79 हजार 499 आहे.त्यात 21 हजार 337 नागरिकांचे ईकेवायसी झालेले आहे तर एक लाख 58 हजार 162 नागरिकांचे केवायसी बाकी आहे.


तालुक्यातील रेशनकार्डधारकांनी जेथे धान्य घेतो त्या रेशन दुकानात जाऊन ई-केवायसी करून घेणे गरजेचे आहे. याबाबत प्रशासनाने रेशनदुकानदारांनाही योग्य त्या सूचना दिल्या आहेत. ई-केवायसी नसणाऱ्यांना पुढे धान्य किवा सबसिडी मिळण्यास अडचण येऊ शकते.

डॉ अमित भारती, पुरवठा विभाग, तहसील कार्यालय.


 
Top