धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील विविध योजनेंतर्गत मंजुर असलेल्या रस्त्याची कामे तात्काळ पुर्ण करण्यात यावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात चिखलफेक आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील, धाराशिव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले की, धाराशिव शहरातील भुयारी गटार योजनेंतर्गत सुरु असलेल्या कामामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. परिणामी पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. भुयारी गटार योजनेतील रस्ते दुरुस्तीसाठी जवळपास 43 कोटी रुपयांचा निधी मंजुर केलेला होता. त्याचबरोबर जिल्हा वार्षीक योजनेंतर्गत महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियान, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना, नागरी दलितेत्तर योजनेंतर्गत शहरातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजुर करण्यात आलेला होता. परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळानंतर विकासाच्या गोष्टी करून सत्तेत आलेल्या सरकारने शहरातील विकास कामावर स्थगिती आणून शहराच्या विकासकामात अडथळा निर्माण केला आहे. परिणामी शहरातील विविध विकासकामे प्रलंबित आहेत. या कामांना स्थगिती दिली नसती तर रस्त्याची कामे पुर्ण झाली असती व नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला नसता. त्यामुळे शहरातील विविध योजनेंतर्गत मंजुर असलेल्या रस्त्याची कामे तात्काळ पुर्ण होणे आवश्यक आहे. तसेच धाराशिव शहराच्या विविध भागातील जवळपास 60 टक्के पथदिवे बंद असल्याने चोरीचे प्रमाण वाढलेले आहे. यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे प्रमाण वाढलेले आहे. याबाबत आपल्या स्तरावर बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावावेत. तरी धाराशिव शहरातील विविध योजनेंतर्गत मंजुर असलेल्या रस्त्याची कामे तात्काळ पुर्ण करणेबाबत संबंधितांना आदेशीत करावे. सदरील कामे वेळेत पुर्ण न झाल्यास शिवसेना स्टाईलने चिखलफेक आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे, माजी नगराध्यक्ष प्रदीप साळुंके, दत्ता बंडगर, शहरप्रमुख सोमनाथ गुरव,प्रवीण कोकाटे, नितीन शेरखाने, प्रशांत साळुंके, बंडू आदरकर, पंकज पाटील, सिध्देश्वर कोळी, गणेश खोचरे, तुषार निंबाळकर, अफरोज पिरजादे, गणेश असलेकर, राणा बनसोडे, सुरेश गवळी, पांडू भोसले, हनुमंत देवकते, अभिराज कदम, सुमित बागल, गणेश साळुंके, मुजीब काझी,साबेर सय्यद, अभिजीत देशमुख, अमित उंबरे, नाना घाटगे, अमित जगधने, गणेश राजेनिबाळकर, प्रसाद पाटील, महेंद्र शिंदे, कालिदास शेरकर, छोटा साजीद, सह्याद्री राजेनिंबाळकर, शिवराज आचार्य, हर्षद ठवरे, अनुज कुदाळ, ओंकार बांगर, यशवंत शहापालक, प्रशांत जगताप, वैभव पाटील, योगेश गरड, प्रसाद राजे, बप्पा कसबे, शिवयोगी चपणे, कलीम कुरेशी, रोहन महाडिक, गणेश मुंडसे आदिंची स्वाक्षरी आहे.