धाराशिव (प्रतिनिधी)-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश समृद्ध होत असून त्यांचे कार्य व शासनाच्या विविध योजनांची माहिती अर्थात ‌‘मोदी गॅरंटी' जनतेपर्यंत पोहोचवून त्यांच्याशी संवाद साधण्याच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या ‌‘गाव चलो अभियाना' अंतर्गत दि. 10 फेब्रुवारी रोजी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जळकोट ता. तुळजापूर येथील नागरिकांशी संवाद साधला. या अभियानांतर्गत त्यांनी आजी माजी शिक्षक, चर्मकार समाज व बॅडमिंटन ग्रुपच्या सदस्यांशी संवाद साधून त्यांच्या अडी अडचणी, मागण्या व संकल्पना जाणून घेतल्या. 

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशभर गाव चलो अभियान राबविले जात असून यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. देशभरात निर्माण केलेले महामार्गाचे जाळे, संरक्षण क्षेत्रातील देशाची वाढलेली क्षमता, राम मंदिराची उभारणी, किसान सन्मान योजना, प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवठ्याची जल जीवन योजना, कलम 370 हटविणे यामुळे नागरिकांत आनंद व्यक्त केला जात आहे. बॅडमिंटन ग्रुपच्यावतीने स्टेडियम सुधारण्याची मागणी केली. तर चर्मकार समाजाच्यावतीने समाज हॉलची मागणी केली.  

यावेळी त्यांच्यासोबत धाराशिव लोकसभा समन्वयक नितीन काळे, सतीश दंडनाईक, संतोष बोबडे, सचिन पाटील, भाजपा जेष्ठ नेते प्रभाकर मुळे, ॲड दिपक आलुरे, गणेश सोनटक्के, आशिष सोनटक्के, सिद्धू कोरे, विवेकानंद मेलगिरी, भिवा इंगोले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



 
Top