तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथील 1881ला स्थापना केलेली निजामकालीन असणारी व 1888-89 साली मान्यता मिळालेली जिल्हा परिषदेची शाळा निव्वळ दुर्लक्षित पणामुळे धोकादायक बनुन बेवड्यांचा अड्डा बनल्याने येथे शिक्षणासाठी येणारे विध्यार्थीं व शिक्षक वृंदाची कुचंबणा होत आहे. निजामाने उभे केलेले सरस्वती मंदिर टिकवणे सरकारला कठीण जात आहे. संध्याकाळी या ठिकाणीं कोणीही अधिकृत असा रक्षक, शिपाई नसल्याने मागील काही वर्षापासुन याचा वापर शौचालय केला जात असून, बेवड्यांसाठी अड्डा बनली आहे.
या शाळेकडे लक्ष देण्यास कुणीही तयार नसल्याने हजारो विध्यार्थांना शिकवणा-या शाळेत आज अवघे साठ विध्यार्थीं शिक्षण आहेत. यांना पाच शिक्षक शिकवत आहेत. तिर्थक्षेञ तुळजापूर मधील ही पहिली शाळा होती. याचे विध्यार्थीं कायम स्वरुपी राज्याच्या गुणवता यादीत झळकत. या शाळेत शिकलेले अनेक विध्यार्थीं शास्ञज्ञ, वैज्ञानिक, अभियंते, प्रशासकीय अधिकारी, ड़ॉक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक, खेळाडु, यशस्वी उधोजक बनले आहेत.
सध्या शाळेच्या सर्वच इमारतीवर जागोजाग वृक्ष उगवले आहे. खिंडक्याचा कांचा तुटल्या आहेत. छताला केलेले निकृष्ट दर्जाचे क्राँकीट पडत आहे. नुकतेच प्राथमिक शिक्षकांचे प्रशिक्षण चालु असतानाचे सिमेंट धपला पडल्याने प्रशिक्षण दुसरीकडे हलविण्याची वेळ गटशिक्षण कार्यालयावर आली आहे. या शाळेच्या दुरुस्तीवर सातत्याने लाखो रुपये खर्च झाला तरीही शाळा गळकीच राहिली. उलट दुरुस्ती कामे केल्यानंतर शाळेची गळती वाढल्याचे बोलले जाते आहे. लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद यांच्या दुर्लक्षित पणामुळे हे सरस्वती मंदिर आज खंडहर बनू लागले आहे.
मंदिर संस्थानने जिर्णोध्दार करावा!
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने जिल्हयातील इतर शाळांना कोट्यावधी रुपये आर्थिक मदत जाहीर केली. पण श्री तुळजाभवानी मंदिर लगत असलेल्या भागातील शाळेस का मदत केली गेली नाही? असा सवाल शहरातील शिक्षणप्रेमी केला जात आहे. या शाळेस मदत करुन ही शाळा वाचवावी, अशी मागणी शिक्षक प्रेमी मधुन केली जात आहे.