धाराशिव (प्रतिनिधी)-बाजारातील सर्रास वापरामध्ये प्लास्टीक फुलांचा वापर 60 टक्के प्रमाणात होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या फुलांच्या विक्रीवर परिणाम होत असून संबधित विभागांना सूचना देवून कृत्रीम फुल निर्माण करणाऱ्या संस्था तसेच विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करावी. अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी केली आहे. अन्यथा या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दुधगावकर यांनी दिला आहे.
या निवेदनात म्हंटले आहे की, बाजारातील सर्रास वापरामध्ये प्लास्टीक फुलांचा वापर 60 टक्के प्रमाणात होत असून यामुळे पर्यावरणाची देखील हानी होत आहे. शेतातील फुलांच्या विक्रीवर 60 टक्के परिणाम सनासुदीच्या काळामध्ये बाजारपेठामध्ये शेती फुलाची मागणी अल्प झाल्यामुळे शेती फुले रस्त्याच्या कडेला टाकलेली वेळोवेळी पहायला मिळतात. शासनाने शेतकऱ्यांना शेडनेट, पॉलीहाउस, फुलांच्या लागवडीसाठी उपलब्ध करुन दिलेले असताना कृत्रीम फुलामध्ये शेडनेट व पॉलीहाउसमधील फुलांना कमीभाव मिळत असल्याने फुल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. याची शासनाने गांभीर्याने नोंद घेणे गरजेचे आहे.त्यामुळे संबंधित विभागाला सूचना देवून कृत्रीम फुल निर्माण करणाया संस्था तसेच विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करावी, अन्यथा याविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे.