धाराशिव (प्रतिनिधी)-शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. मागण्यांची पंधरा दिवसात दखल घेऊन प्रशासकीय पातळीवर प्रश्न सोडवावेत अन्यथा नळदुर्ग येथील बस स्थानकासमोर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असे निवेदन शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना (दि.26) देण्यात आले.

निवेदनात म्हटले की, तुळजापूर तालुका दुष्काळ यादीत समावेश करून दुष्काळ उपाययोजना तात्काळ करावी, धाराशिव जिल्हयातील तीन तालुक्याचा समावेश दुष्काळी यादित करण्यात आला, परंतु तुळजापूर तालुक्यातही अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे रब्बी व खरीप पिक हातातून गेली असून त्याचे उपाययोजना करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी देणाऱ्या मोटारी बंद करण्यात आल्या. त्यामुळे जनावरांचा चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर शेतीमध्ये काम करणाऱ्या शेतमजुरांच्याही हाताला काम नसल्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर कांद्यावरील केंद्र सरकारने लावलेली निर्यातबंदी उठवावी, तुळजापूर तालुक्यातील अनेक शेतकरी अग्रीम पीकविम्यापासून वंचित आहेत. ज्या शेतकऱ्यांना रक्कम मिळाली नाही त्या सर्व शेतकऱ्यांना पंधरा दिवसाच्या आत अग्रीम विम्याची रक्कम खात्यावर जमा करण्यात यावी. उर्वरित पीक विम्याची शेतकऱ्यांची रक्कम आजही सरकारकडे राहिलेले असून सरकार राहिलेल्या उर्वरित पिक विम्याची शेतकऱ्यांची रक्कम पंधरा दिवसाच्या आत शेतकन्यांच्या खात्यावरती जमा करावी.

तुळजापूर तालुक्यात अचानक वाढलेल्या थंडीमुळे साथीचे आजार वाढले आहेत. शासकीय रुग्णालयात पुरेशी औषधे उपलब्ध नाहीत त्यामुळे नागरिकांना बाहेरचे महाग औषधे विकत घ्यावी लागत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर शासकीय रुग्णालयात औषधे उपलब्ध करून द्यावी,  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 सोलापूर ते कर्नाटकच्या रस्त्याचे काम गेल्या काही वर्षापासून सुरू असून ते अर्धवट असून अतिशय संथ गतीने चालू असून त्याचा सर्वसामान्य वाहनचालक, नागरिकांना फुलवाडी व तनमोड येथील पथकर गेल्या अनेक वर्षापासून अनाधिकृतपणे चालू असून तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील उड्डाण पूल, नळदुर्ग बायपास गेल्या अनेक वर्षापासून अर्धवट असून सर्वसामान्य प्रवासी वाहनदार नागरिकांना आर्थिक व भूर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे फुलवाडी व तलमोड येथील पथकर नाके अर्धवट रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत बंद करण्यात यावेत.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 652 नळदुर्ग-अक्कलकोट रस्त्याचा विषय उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात न्यायप्रविष्ट असून जुन्या रस्त्याबाबत विषय न्यायालयात प्रलंबित असताना लोकप्रतिनिधी दिशाभूल करणारी व चुकीची माहिती प्रसार माध्यमातून देत असून शेतकन्यांना त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम करत आहेत. हा उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असून शेतकन्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरवण्याचे काम केले जात आहे. अशा लोकप्रतिनिधीनी व प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रसारमाध्यमातून न्यायप्रविष्ठ विषयाची माहिती लेखी स्वरुपात देण्यात यावी. तुळजापूर तालुक्यातील एका रात्रीत वर्ग एकच्या जमिनी वर्ग दोन केलेले आहेत. शेतकन्यांना ही बाब त्रासदायक ठरणारी आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनीवर घाव घालण्याचा प्रयत्न केला आहे. अशा सर्व जमिनी पुन्हा शेतकऱ्यांच्या वर्ग एक मध्ये करून त्यांना न्याय देण्यात यावा. या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर अक्कलकोट नळदुर्ग महामार्ग क्रं. 652 बाधीत शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने नियुक्त केलेले समन्वयक दिलीप गणपतराव जोशी, शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष सरदारसिंग ठाकुर, तुळजापूर तालुकाध्यक्ष व्यंकट पाटील यांची स्वाक्षरी आहे.


 
Top