नळदुर्ग (प्रतिनिधी)-तुळजापुर तालुक्यात दुष्काळ जाहीर करुन नागरीकांना पिण्यासाठी पाणी राखीव ठेवावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक  जगदाळे यांनी केली आहे.

संपुर्ण मराठवाड्यात यावर्षी पावसाने ओढ दिली असुन खरीप पिक उत्पादनात घट झाली आहे.रब्बीची पेरणीही दहा टक्केच्या जवळपास झाली असुन येत्या कांही दिवसात दुष्काळाची तीव्रता वाढत जाणार आहे.जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही अतीशय गंभीर होणार आहे.सध्या तालुक्यात पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. नागरीकांना पिण्याच्या  पाण्यासाठी भटकावे लागणार की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे  त्वरीत लक्ष देवुन तलावातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवावे असेही अशोक जगदाळे यांनी म्हटले आहे.तुळजापुर तालुक्यात महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र ,कर्नाटक,आंध्रप्रदेशातुन लाखो भाविक दररोज येतात तसेच नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ला पाहण्यासाठी दररोज असंख्य पर्यटक शहरात येत असतात या दोन्ही शहरास नळदुर्ग येथील बोरी धरणातुन पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो. याच धरणातुनआणखी कांही गावांनाही पिण्याचे पाणी पुरवले जाते  सध्या धरणातील पाण्याचा उपसा वाढल्याने व तीव्र उष्णतेमुळे  या धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. यावर्षी पाऊस अतीशय कमी झाल्याने बोरी धरण ,खंडाळा धरण,व परीसरातील बाभळगांव तलाव, तीस टक्केच भरले आहेत. हे पाणी जेमतेम मार्च एप्रिल पर्यंत पुरेल एवढेच आहे.त्यामुळे धरणात सध्या जो पाणीसाठा आहे तो नागरीकांना, जनावरांना व प्राण्यांन पिण्यासाठी पुढील काळात पुरेल येवढे पाणी राखीव ठेवावे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक  जगदाळे यांनी केली आहे.

नळदुर्ग बोरी धरणातील पाणी शेतीला द्यावे ही भुमिका योग्य नाही.नळदुर्ग शहराची लोकसंख्या ही आता दहा पंधरा हजार नसुन ती पन्नास हजाराच्या जवळ गेली आहे. तसेच बँरेज क्र. एक मधुन नळदुर्ग पाणी फिल्टरटाकी पर्यंतचे अंतर चार कि.मी.चे असुन पाईपलाईन ही नाही. मग या बैरेज मधुन पाणी पुरवठा करणार कसा असा प्रश्नही जगदाळे यांनी उपस्थित केला आहे.


 
Top