धाराशिव/प्रतिनिधी -

जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मागच्या काही दिवसांमध्ये विविध निवडणुकांमुळे  जनता दरबार घेणे शक्य झाले नाही. मात्र मागील दोन दिवसांपूर्वी तुळजापूर येथे व आज धाराशिव येथे जनता दरबार घेवून नागरिकांच्या अडी अडचणी जाणून त्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करता येत असल्यामुळे या जनता दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तसेच राज्यात शिंदे-फडणवीस हे आपल्या हक्काचे सरकार असल्यामुळे जनतेची विविध कामे होत असून त्यांच्या अनेक समस्या या जनता दरबारामध्ये मार्गी लावू शकलो, अशी माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारानंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

पुढे बोलताना आ. पाटील म्हणाले की, आपल्या हक्काचे सरकार असल्यामुळे जनतेची कामे होत असल्याचे लोकांच्या विशेष लक्षात येत आहे. तर केसरी कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांना स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून देण्यात येत असलेले बंद झालेले धान्य शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यानंतर राज्य सरकारने सुरु करण्याची नुकतीच घोषणा केली आहे. या घोषणेनुसार त्या सर्व शेतकऱ्यांना यापुढे दर महिन्याला त्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या नावे रु. १५० प्रमाणे ती रक्कम त्या घरातील कुटुंब प्रमुख असलेल्या महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. सर्वसामान्यांच्या हिताचे असे अनेक चांगले निर्णय सरकार घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून प्रत्येकानी लवकरात लवकर अर्ज भरून द्यावेत असे आवाहन केले. 

तसेच खरीप  २०२२ मधील पिकांच्या नुकसानीपोटी विमा वितरणास सुरुवात झाली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये १७० ते १८० कोटी रुपये जमा होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याचे पीक विमा कंपनीला कळविले होते. परंतू त्यांचे पंचनामे झालेले नाहीत, अशा शेतकऱ्यांना त्या त्या मंडळात नुकसान भरपाई दिलेल्या इतर शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई रक्कमेची सरासरी काढण्याचे काम सुरू असून ती नुकसान भरपाईची रक्कम देखील येत्या १५ दिवसांमध्ये दिली जाईल असे आश्वासन आ. पाटील यांनी दिले. 

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, जिल्हा समन्वयक नेताजी पाटील, तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटील, तेरणा कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश देशमुख, पंसचे माजी सभापती नानासाहेब कदम, भाजयुमोचे राजसिंह राजेनिंबाळकर, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष ओम नाईकवाडी आदी पदाधिकाऱ्यांसह बहुसंख्येने नागरीक व अधिकारी उपस्थित होते.

.................................................................

स्वयंरोजगार निर्मितीमध्ये जिल्हा अव्वल 

जिल्ह्यात स्वयंरोजगार निर्मितीकडे तरुणांचा कल वाढलेला आहे. प्रधानमंत्री रोजगार योजना व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना याच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५५० पेक्षा अधिक युवक युवतींनी लहान मोठे उद्योग सुरु करून स्वतः सह इतरांना रोजगार निर्माण केला आहे. त्या माध्यमातून त्यांना हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे. स्वंयरोजगार निर्मितीसाठी ग्रामीण भागात ३५ टक्के तर शहरी भागात २५ टक्के सबसिडी (अनुदान) देण्यात येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त युवक- युवतींनी या योजनेची माहिती घेऊन या योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.

 
Top