उस्मानाबाद / प्रतिनिधी-

   मागील आठवड्यात रेल्वेने मराठवाड्यातील लातूर, धाराशिव जिल्ह्यांसाठी नविन गाड्यांचा लावलेला सपाटा पाहता ऑक्टोंबर महिन्यात खासदारांनी केलेल्या आंदोलनाचा घाव वर्मी बसल्याचे स्पष्ट झाले आहे. रेल्वे विभागीय समितीच्या अध्यक्षांसह काही सदस्यांनी राजीनामे देत जोरदार टिका केल्यानंतर रेल्वेचे अधिकारी सुतासारखे सरळ झाले आहेत. 18 ऑक्टोबर 2022 रोजी पुणे येथे पुणे व सोलापूर विभागीय रेल्वे समितीची बैठक बोलावण्यात आली होती समितीचे अध्यक्ष माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईकनिंबाळकर यांच्यासह धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, यांच्यासह इतर खासदार उपस्थित होते.

  कोरोना काळात रेल्वे बोर्डाने बंद केलेल्या रेल्वे कोरोना निर्बंध शिथील झाल्यानंतर पुर्ववत सुरु झाल्या नव्हत्या यासाठी मागील 2 वर्षापासून रेल्वे अधिकाऱ्यांकडे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पाठपुरावा करुन देखील रेल्वेचे अधिकारी खासदारांच्या पत्रांना केराची टोपली दाखवत होते. त्यामुळे या सर्व खासदारांनी याबाबतचा जाब समितीच्या बैठकीत विचारला होता त्यावर उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांनी नकारात्मक उत्तरे देण्याचा सपाटा लावला त्यावरुन संतप्त होत समितीचे अध्यक्ष खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व इतर काही सदस्यांनी संतप्त होत राजीनामा देत बैठकीवर बहिष्कार घातला त्यावर रेल्वेचे अधिकारी या आक्रमकतेने भांबावून गेले. अखेर या घटनेनंतर अगदी रेल्वे मंत्रालयापर्यंत ही चर्चा गेली त्यावर वरीष्ठ अधिकाऱ्यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा बडगा उचलला त्यानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आजपर्यंत केलेल्या मागणीची पत्रे हाती घेतली त्यांनी केलेल्या मागणीची दखल घेत अखेर धाराशिव, लातूर ते तिरुपती, आणि मुंबई साठी आणखी 1 नविन गाडी गुलबर्गा ते लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई या दोन नविन साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्या सुरु केल्या आहेत. अनेक दिवसांपासून बंद असलेली अमरावती-पुणे ही द्विसाप्ताहिक गाडी सुरु केली आहे. अर्थात पुर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे ही गाडी अधिक सोयीची होती. रेल्वे विभागीय समितीच्या बैठकीत खासदारांना आक्रमक भूमीका घेत राजीनामास्त्र वापरले नसते तर अजुनही रेल्वेचे अधिकारी सुस्त राहिले असते हे नक्की.

 
Top