तुळजापूर  / प्रतिनिधी-

तुळजापूर तालुक्यातील महावितरण कंपनीचा घरगुती वीज ग्राहकांच्या वीजबिलाबाबत मनमानी कारभार सुरू असून, गेल्या 2-3 महिन्यात जागेवर बसूनच ग्राहकांना अंदाजे बिले पाठविण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. याबाबत तुळजापूर येथील कार्यकारी अभियंता व कार्यालयातील काही कर्मचारी ग्राहकांना अत्यंत उध्दट भाषेत बोलत असल्याने महावितरणच्या जिल्ह्यातील अधीक्षक अभियंता अधिकार्‍यांनी वेळीच दखल घ्यावी. दरम्यान, तालुक्यातील घरगुती वीज ग्राहकांची बिले येत्या 8 दिवसात दुरूस्त करून द्यावीत, अन्यथा राष्ट्रवादीच्या वतीने वीज कंपनी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा उपाध्यक्ष तथा माजी सैनिक शिवाजी सावंत यांनी दिला आहे.  

याबाबत विस्ताराने बोलताना ते म्हणाले की, तुळजापूर तालुक्यातील विविध गावच्या वीज ग्राहकांच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. तुळजापूर कार्यालयाकडून मीटर रिडिंगसाठी नेमण्यात आलेले खाजगी कर्मचारी वीज ग्राहकांच्या मीटरची अनेक महिने रिडिंगच घेत नाहीत. या कार्यालयाकडून अंदाजे वीजबिले पाठविण्यात येतात. काही वेळा तर एक ते दोन वर्षानंतर त्यांच्या मीटरची रिडिंग घेवून हजारोंनी बिले विनाकारण जास्तीची पाठवित आहेत. यामुळे प्रामाणिक बील भरणा करणार्‍या ग्राहकांवर वीज बिलांचा अचानक आर्थिक ताण येत आहे. तालुक्यातील तामलवाडी येथे तर अनेक ग्राहकांच्या अशा तक्रारी वाढल्या आहेत.

तुळजापूर येथील वीज कंपनी कार्यालयातील संबंधित कर्मचारी याबाबत ग्राहकांचे म्हणणे अजिबात ऐकून घेत नाहीत. अगोदर बील भरा पुन्हा तुमचं बोला. वीज बील भरले नाहीतर तुमची वीज जोडणी तोडली जाईल... अशा शब्दात ग्राहकांना दम देण्याचा प्रकार करतात. जे ग्राहक रेग्युलर वीजबिले भरतात त्यांनाही एक-दोन वर्षानंतर असा दणका देण्याचा सपाटा या कार्यालयाने सुरू केला आहे. अचानक 20 हजार, 30 हजार, 40 हजार घरगुती बिले निघू लागल्याने ग्राहकांतूनही या कार्यालयातील कर्मचार्‍यांबाबत रोष निर्माण होत चालला आहे. यामुळे जिल्हा अधीक्षक अभियंत्यांनी याची गंभीर दखल घ्यावी आणि ग्राहकांची वीज बिले नियमानुसार घ्यावीत. या तालुक्यातील अशा ग्राहकांची वीजबिले येत्या 8 दिवसांत दुरूस्त नाही केल्यास राष्ट्रवादीच्या वतीने या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सावंत यांनी दिला आहे.


 
Top