तुलजापूर / प्रतिनिधी-

 ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोलफ्री नंबर 18002703600 वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जाणार आहे. परिसरातील नागरिकांना घटना घडत असतानाच घटनेची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होणार आहे.

शहरातील पोलिस संकुल येथे आयोजित कार्यक्रमात ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील, पोलिस निरीक्षक आजिनाथ काशिद, पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोर्डे यांनी यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखवले. पोलीस स्टेशन हद्दीत संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोलफ्री नंबर 18002703600 वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जाणार असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होणार आहे.

कार्यक्रमाला तुळजापूर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व ३५ गावांमधील पोलिसपाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती. या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता मुसळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक राहुल रोटे, बसवेश्वर चनशेट्टी उपस्थित होते. 

 
Top