उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरातील गणेश नगर भागात झालेल्या चोरीमध्ये 20 तोळे सोनेसह 7 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची घटना घडली असून यामुळे या भागात दहशतीचे वातावरण आहे.

लातूर येथील संजय सौदागर हे त्यांच्या पत्नी मुलीसह उस्मानाबाद येथील त्यांचे मेहुणे बालाजी जठार यांच्या घरी गडंगण जेवण्यासाठी आले होते, त्यानंतर त्यांनी सोलापूर येथे खरेदी करून रात्री जठार यांच्या घरी मुक्काम केला. यावेळी 9 नोव्हेंबर रोजी रात्री तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दरवाज्याच्या आतील कोंडा लोखंडी रॉडने तोडून घरातील पर्स चोरून नेली. यामध्ये 91 हजार रुपये किमतीचे दोन सोन्याची लॉकेट, एक लाख दहा हजार रुपये किमतीचे सोन्याचे ब्रासलेट, 1 लाख 15 हजार रुपयांचे सोन्याचे अडीच तोळ्याचे नेकलेस, सोन्याचे पेंडल ,अंगठ्या ,लक्ष्मी हार ,कानातले सोन्याची नथ ,बोरमाळ, गंठण, नाकातली मोरणी, चांदीचा मेकला असे 15 तोळे सोनेसह सात लाख रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. 

याप्रकरणी संजय सौदागर यांनी दिलेल्या तक्रारीवरून उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शंकर सुर्वे करीत आहेत. या घटनेनंतर उस्मानाबाद पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी व चौकशी केली तसेच श्वानपथक ही मागविले मात्र चोरटयापर्यंत श्वान पथक पोहोचले नाही, भर वस्तीतील भागात मोठी चोरी झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

 
Top