उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या एका २३ वर्षीय महिलेचा पतीसह सासरच्या मंडळीकडून छळ करण्यात आल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार लग्न झाल्यानंतर सदर विवाहितेचा विवाहापूर्वी कौमार्य भंग झाल्याच्या संशय व्यक्त करून तिचा छळ करण्यात आला. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, जिल्ह्यातील एका गावात २३ वर्षीय युवतीचा (नाव- गाव गोपनीय) महिनाभरापूर्वीच विवाह झाला होता. विवाहानंतर विवाहितेचे कौमार्य विवाहापूर्वीच भंग झाले आहे, असा संशय तिच्या पतीने व्यक्त केला. या कारणावरुन तसेच त्या नवविवाहितेने माहेराहुन पैसे आणावेत अशा कारणांसाठी पती, सासू-सासरे यांच्यासह सासरकडील आठ लोकांनी तिचा शारिरीक, मानसिक छळ केला. संबंधित विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून उपरोक्त ८ जणांवर ४९८(अ.), १०९, ३२३,५०४,३४ अंतर्गत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


 
Top