उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कोरोनाबाबत लोकाच्या मनामध्ये असलेले गैरसमज दूर करून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने 15 दिवसाचे कोरोन केंद्रीत व्यवस्थापन करा.कोरोना केंद्रातील स्वच्छता , रोजची साफसफाई जेवणाची गुणवत्ता यावर लक्ष  ठेवा.लोकप्रतिनिधी,नगरसेवक,सरपंच आदींची कोरोनाच्या उपाययोजेनेच्या कामात मदत घ्या. कोणत्याही परिस्थिीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढणार नाही.यासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज  येथे दिले.

 जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणूबाबत करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनाबाबत व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे आज आढावा घेण्यात आला तेव्हा श्री दिवेगावकर बोलत होते. या व्हिडीओ कॉन्फरसिंगला जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड,अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,जि.प.चे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत वडगावे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डि.के.पाटील तर जिल्हा भरातून सर्व उपविभागीय अधिकारी,तहसीलदार, गटविकास अधिकारी,वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले होते.

शासकीय कार्यालयातील अभ्यागत आणि कर्मचारी यांच्यामध्ये सामाजिक अंतर राहीले पाहिजे, कार्यालयात येणाऱ्याचे थर्मल गणने तापमान मोजले जावे,ऑक्सीमीटरचा वापर केला जावा,सॅनिटायझरचा वापर करण्यात यावा.ग्रामीण आणि शहरी भागात कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणार नाहीत याबाबत दक्षता घेतली पाहिजे. यासाठी देण्यात आलेल्या सूचनांप्रमाणे समित्या स्थापन करून शहरात गस्त वाढविली पाहिजे, मास्कचा वापर आणि इतर नियमाचे पालन, याबाबत लोकांमध्ये जाणीव जागृती करण्याबरोबरच मास्क न वापरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली पाहिजे, असे सांगून श्री. दिवेगावकर म्हणाले की, होम आयसोलेशनमध्ये असलेली लोकं घराबाहेर फिरता कामा नयेत, त्यांच्या घरी भेटी देऊन त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या कोरोना टेस्ट झाल्या आहेत का यांची विचार पुस करा,वॉर्ड समित्या आणि ग्राम समिती मार्फत त्यांना योग्य ती मदत करा.कोरोनाची लक्षण असणाऱ्या लोकांच्या टेस्ट करून पॉझिटिव्ह असणाऱ्यावर उपचार सुरू करण्यासाठी अशा लोकांमध्ये जागृती करावी,असेही ते म्हणाले.

कोरोना टेस्टची संख्या वाढविण्यात आली आहे.त्यामुळे लक्षणे असलेल्यांवर वेळेवर उपचार होऊन ही साथ आटोक्यात आणण्यास मदत होईल.त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह

आलेल्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढविले पाहिजे, व्यापारी,व्यवसायिक यांच्या कोरोना टेस्ट झाल्या पाहिजेत, प्रत्येक रुग्णांलयात येणाऱ्या रूग्णांची कोरोना टेस्ट केली पाहिजे.खाजगी रुग्णालयांनी परस्पर कोरोना ग्रस्त रूग्ण आहे किंवा नाही हे ठरवू नये तर अशा रुग्णांना टेस्ट करण्यास सागावे, तरच कोरोनाची साथ आटोक्यात येईल,असे सांगून जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर म्हणाले की,हॉटेल,बार,यांच्या सेवा नियमाप्रमाणे सुरू आहेत किंवा नाही याची तपासणी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी –कर्मचाऱ्यामार्फत करा, बार आणि वाईन शॉपची तपासणी उत्पादन शुल्कच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी करावी. कोरोना केंद्रामध्ये रुग्णांना आरोचेच पाणी पिण्यासाठी मिळेल याची दक्षता घ्यावी. कोरोना केंद्राची संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी दररोज पाहणी करावी. तेथील अडीअडचणी सोडवाव्यात.गर्दी करणाऱ्यावर, नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई पोलिसांनी करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

कोरोनाची लक्षणेअसणाऱ्या , तसेच गंभीर रुग्णांच्या बेडचे व्यवस्थापन करण्याचे काम संबंधितांनी करावे.गंभीर होऊ शकणाऱ्या रुग्णांची माहिती संबंधितांना द्या म्हणजे त्यांच्या उपचाराची कुठे व्यवस्थाकरायची यांचे नियेाजन करता येईल.ग्रामीण भागात ग्रामसुरक्षा मंडळाना सक्रीय करा.माझे कुटुंब माझी जबाबदारी  या मोहिमेतील 35 हजार कोविड ऑर्बिट रूग्णांचे प्राधान्याने लसीकरण करण्यावर भर द्या.तहसीलदारांनी मतदार याद्यांमध्ये 65 वर्षे  वयांवरील लोकांची माहिती पीडीएफ मध्ये उपलब्ध करून त्यांना कोरोना लस देण्याचे नियोजन करावे. 45 वर्षावरील पत्रकार,वकील आदींचे लसीकरण करावे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ग्रामीण भागात होम आयसोलेशनचे स्टिकर संबंधित रुग्णांच्या घरावर लागले पाहिजे. अशा घरातील माणसं घराबाहेर पडणार नाहीत,दुसरे जाऊन त्यांना भेटणार नाहीत,यावर देखरेख केली पाहिजे,असे सांगून डॉ.फड म्हणाले की,ग्रामीण भागातील दुकाने, पीठ गिरण्या, टेलर आदी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्यांच्या कोरोना टेस्ट झाल्या पाहिजेत.तसेच ग्रामीण भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही स्वत:च्या टेस्ट करून घेतल्या पाहिजेत.लग्न समारंभ, बाजार आणि अंत्यविधीच्या वेळी गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे.शिक्षकांनी कोरोना जनजागृतीचे काम करावे आणि स्थानिक प्रशासनास मदत करावी, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

 
Top