उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 बारा बलुतेदारांचे कोरोनाच्या लाॅकडाऊन काळात व्यवसाय बंद असल्यामुळे स्वतंत्र आर्थिक पॅकेजची घोषणा कारावी यासह अन्य मागण्यासाठी ओबीसी मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. 

जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. ५एप्रिल २०२१ पासून राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आपण राज्यात लाॅकडाऊन जाहीर केले. या लाॅकडाऊन मध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतू न्हावी,माळी, सुतार, कुंभार, शिंपी, परीट, इत्यादी बाराबलुतेदारामधील छोटया जातीतील परंपरागत व्यवसाय पूर्णता बंद आहे,  त्यामुळे आधीच गरीब परिस्थिती असलेला  हा समाज लाॅकडाऊनमुळे जास्तच जास्तच आर्थिक अडचणीत आलेला आहे. एकप्रकारे या समाजावर उपासमारीची वेळ आलेली आहे. 

आपण लाॅकडाऊन जाहीर करताना ऑटोरिक्षा चालक, बांधकाम मजूर,  फेरीवाले इत्यादी लोकांकरीता आर्थिक सहाय्य जाहीर केले. परंतू न्हावी,माळी, सुतार, कुंभार, शिंपी, परीट बाराबलुतेदारासाठी  कुठलेही आर्थिक सहाय्य जाहीर केले नाही. या व्यवसायांना प्रति कुटुंब पाच हजार महिना आर्थिक सहाय्य करावे तसेच उस्मानाबाद जिल्ह्य़ात कोरोना रुग्णाचे बाबतीत बेड उपलब्ध होत नाहीत. याकरीता ग्रामीण भागात कोव्हिड केअर सेंटर पंचायत समिती गणात एक याप्रमाणे सुरु करुन कोरोना रुग्णांची व्यवस्था व उपचार कसे चांगले होतील याबाबत आपण शासन स्तरावर प्रयत्न करावे अशी मागणी करण्यात आली आहे.  यावेळी  ओबीसी जिल्हाध्यक्ष  विजय शिंगाडे, महाराष्ट्र प्रदेश सचिव  पिराजी   मंजुळे, िल्हा उपाध्यक्ष नंदकुमार माळी उपस्थित होते. 


 
Top