उस्मानाबाद/ प्रतिनिधी

नैसर्गिक नुकसान झालेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २० कोटी ५८ लाख रुपयांची नुकसान भरपाई शासनाने मंजूर केली आहे. दि.१ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२० या कालावधीत वादळी वारा, पाऊस व गारपीटीमुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे नुकसान झाले होते. त्याची नुकसान भरपाई महाविकास आघाडीच्या सरकारने मंजूर केली आहे. एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या २९ हजार ९४५ इतकी होती. त्यातील एकट्या कळंब तालुक्यातील बाधितांची संख्या २९ हजार ९२७ एवढी आहे. कळंब तालुक्यासाठी १९ कोटी २७ लाख रुपयाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आली आहे अशी माहिती आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे.

मागील वर्षी अवकाळी पावसामुळे जिल्ह्यामध्ये २४ हजार ५६९ हेक्टर इतके क्षेत्र बाधित झालेले होते. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर तसेच जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय अधिकारी यांच्यासोबत त्यावेळी बाधित क्षेत्राची पाहणी केली होती. आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदत देण्याबाबत संयुक्त पंचनामे करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची आपत्तीग्रस्ताना भरपाई मंजूर झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधितांना मदत देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीच्या १६ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार निधीची प्रतीक्षा होती. जिल्ह्यासाठी २० कोटी ५८ लाखाचा निधी मिळाला असून कळंब तालुक्यात नुकसानीचा आकडा अधिक असल्याने कळंब तालुक्यासाठी १९ कोटी २७ लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. ही रक्कम लवकरच बँक खात्यावर जमा करण्यास सुरुवात होणार आहे. आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री शंकरराव गडाख-पाटील आमदार तानाजीराव सावंत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आदींची शेतकऱ्यांच्यावतीने आभार मानले आहेत.


 
Top