प्रतिनिधी / लोहारा-
शेतजमिनीच्या वादातून मारहाणीत एका माजी सैनिकाचा जागीच मृत्यू झाला तर तीन महिलांसह चौघे गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना लोहारा तालुक्यातील कास्ती (बुद्रुक) येथे मंगळवारी रात्री घडली आहे.
लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील माजी सैनिक बालाजी भगवान कवठे (५०) हे सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी त्यांची सासरवाडी म्हणजेच कास्ती (बुुद्रुक) शिवारात मनोहर हरीपंत राकेलकर यांची पाच एकर ११ गुंठे शेतजमीन खरेदी केली. याच शेतात गेल्या वर्षी विहीर व विंधन विहीर घेतली आहे. ही शेतजमीन त्यांनी त्यांचे मेव्हणे (पत्नीचा भाऊ) ज्ञानेश्वर व्यकंट चव्हाण यांना भागीन म्हणून कसण्यासाठी दिली होती. परंतु, गेल्या चार वर्षापासून त्या शेतजमिनीतील अर्धी मालकी द्यावी, यासाठी मेव्हणा ज्ञानेश्वर याने बालाजी यांच्याकडे तगादा लावला होता. ज्ञानेश्वर याने अनेक वेळा बहिण व भाऊजीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे याबाबत ज्ञानेश्वर याच्या विरोधात स्वत: बहिणेने पोलिसात तक्रार दिली होती. मंगळवारी (दि.१४) रात्री ज्ञानेश्वर चव्हाण याने सख्खा भाऊ असलेल्या सुधाकर चव्हाण यांच्या घरी येऊन बहीण, भाऊजीला मदत करतोस म्हणत मारहाण केली. या प्रकाराची माहिती मिळताच बालाजी कवठे हे कास्ती येथे आले. यावेळी ज्ञानेश्वर, त्यांची पत्नी अनुसया, मुलगा सचिन, तुषार यांनी मिळून मेव्हणा बालाजी, भाऊ सुधाकर व त्यांची पत्नी लक्ष्मी, मुलगी दिव्या यांना बेदम मारहाण सुुरू केली. तु शेत शेतच करतोस, आम्हाला देत नाहीस म्हणत तुषारने बालाजी कवठे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचे दोन घाव घातले. यात बालाजी हे जागीच ठार झाले. त्यानंतर सचिन, तुषार यांनी दिव्याच्या तोंडावर कुऱ्हाडीचा वार केला. या मारहाणीत सुधाकर चव्हाण (५०), लक्ष्मी चव्हाण (४५), दिव्या चव्हाण (२४), मुक्ताबाई मधुकर लोभे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी उस्मानाबादला हलवले असून सुधाकर व दिव्या यांची प्रकृती चिंताजनक आहे.अक्षय कवठे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ज्ञानेश्वर चव्हाण, अनुसया चव्हाण, सचिन चव्हाण, तुषार या चौघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
Top