धाराशिव (प्रतिनिधी)- राज्य सरकारने यंदापासून गणेशोत्सवाला ‌‘राज्य महोत्सव' म्हणून घोषित केले असून, गणेशोत्सवाची परंपरा आणि संस्कृती जपण्याबरोबरच हा उत्सव व्यापक स्वरूपात साजरा व्हावा. जिल्ह्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन राज्यस्तरापर्यंत पोहोचावे,यासाठी संबंधित यंत्रणांनी मंडळांना प्रोत्साहित करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज शुक्रवारी 4 सप्टेंबर रोजी यंदाच्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देणे तसेच विविध उपक्रम राबविण्याच्या अनुषंगाने संबंधित यंत्रणांची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत जिल्हाधिकारी पुजार बोलत होते.

बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदळकर,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, स्वाती शेंडे,अरुणा गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे,उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख व गणेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी पुजार म्हणाले, “गणेशोत्सवानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांनी ऑनलाइन नोंदणी करावी. संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात शांतता समित्यांच्या बैठका घ्याव्यात.या बैठकांमध्ये गणेशोत्सव ‌‘राज्य महोत्सव' म्हणून साजरा करण्याबाबतच्या शासन निर्णयाची माहिती गणेश मंडळे आणि संबंधितांना द्यावी.”

जिल्ह्यात चांगले आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारी गणेशोत्सव मंडळे राज्यस्तरावरील स्पर्धेत पोहोचली पाहिजेत. त्यासाठी विविध यंत्रणांनी त्यांना आवश्यक प्रोत्साहन द्यावे. पारंपरिक लोककला लोप पावत असताना गणेशोत्सवासारख्या व्यापक लोकसहभागाच्या उत्सवाच्या माध्यमातून या लोककलांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे.गणेश मंडळांनी आपल्या उपक्रमांमधून पारंपरिक लोककलांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर प्रभावी जनजागृती करता येते.त्यामुळे विशेषतः गणेश मंडळांनी जलसंवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी केले.जिल्ह्यातील विविध गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विविध उपक्रम राबविण्यात यावेत. त्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी गणेश मंडळांना सहभागी करून घेत त्यांना प्रोत्साहन द्यावे,असेही त्यांनी स्पष्ट केले.

गणेशमूर्तींच्या विसर्जनावेळी पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य देण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी पुजार यांनी सांगितले.गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे जलस्रोत दूषित होणार नाहीत,याची दक्षता घ्यावी. गावांमध्ये आणि शहरांमध्ये योग्य ठिकाणी गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम टँक तयार करावेत,असे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांनी सांगितले की, जिल्ह्यात एकूण 1 हजार 680 गणेशोत्सव मंडळे आहेत. यापैकी 256 ठिकाणी ‌‘एक गाव,एक गणपती' ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.धाराशिव येथील गणेश विसर्जन मार्ग निश्चित करण्यात आला आहे,असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांनी यंदापासून राज्य सरकारने गणेशोत्सवाला ‌‘राज्य महोत्सव' म्हणून घोषित केल्याची माहिती दिली.तसेच गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यासंदर्भातील शासन निर्णयाची सविस्तर माहिती त्यांनी बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. या बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी,सर्व तहसीलदार तसेच सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.


 
Top