धाराशिव (प्रतिनिधी)- राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी अँग्रीस्टॅक उपक्रमात धाराशिव जिल्हा सातत्याने उल्लेखनीय प्रगती करत आहे. 7 जुलै 2026 पर्यंत जिल्ह्यातील 4 लाख 77 हजार 44 खातेदारांपैकी 3 लाख 89 हजार 23 शेतकऱ्यांची अँग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण झाली असून, जिल्ह्याची एकूण प्रगती 81.55 टक्क्यांवर पोहोचली आहे. 6 जुलै रोजी एकाच दिवसात जिल्ह्यात 25 नवीन नोंदणीची भर पडली. तालुकानिहाय पाहता तुळजापूर येथे सर्वाधिक 9, धाराशिव येथे 6, भूम, उमरगा आणि परंडा येथे प्रत्येकी 3, वाशी येथे 1 नोंदणी झाली.कळंब आणि लोहारा तालुक्यात त्या दिवशी नवीन नोंदणी झाली नाही.
तालुकानिहाय प्रगतीमध्ये कळंब तालुका 86.29 टक्के नोंदणीसह अव्वल असून,त्यापाठोपाठ उमरगा (85.71 टक्के),वाशी (85.07 टक्के),लोहारा (83.26 टक्के), परंडा (82.66 टक्के),भूम (80.21 टक्के),धाराशिव (79.59 टक्के) आणि तुळजापूर (75.50 टक्के) असा क्रम आहे.
अँग्रीस्टॅक ही देशातील शेती क्षेत्राला डिजिटल बळ देणारी महत्त्वपूर्ण प्रणाली असून,प्रत्येक शेतकऱ्याचा स्वतंत्र डिजिटल कृषी ओळख क्रमांक तयार केला जात आहे. या आयडीमुळे शेतकऱ्यांची जमीन,पिके आणि शासकीय योजनांशी संबंधित माहिती एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विविध योजनांचा लाभ मिळविण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक,सुलभ आणि वेगवान होईल.
भविष्यात पीकविमा,पीक नोंदणी, कृषी अनुदाने, पीक कर्ज,नैसर्गिक आपत्ती नुकसानभरपाई,कृषी सल्ला,विविध शासकीय योजना तसेच शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण यांसारख्या अनेक सेवांसाठी अँग्रीस्टॅक फार्मर आयडी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने हा आयडी तयार करून घेणे ही काळाची गरज असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
जिल्हाधिकारी पुजार यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करताना सांगितले की,ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अँग्रीस्टॅक नोंदणी केलेली नाही,त्यांनी विलंब न करता जवळच्या कृषी विभाग, ग्रामस्तरीय सुविधा केंद्र किंवा संबंधित नोंदणी केंद्रावर जाऊन आपली नोंदणी पूर्ण करावी.
अँग्रीस्टॅक फार्मर आयडी हा भविष्यातील डिजिटल कृषी व्यवस्थेचा पाया ठरणार असून, शासकीय योजनांचा लाभ कोणत्याही अडचणीशिवाय मिळण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडे हा क्रमांक असणे अत्यावश्यक आहे. शासनाच्या कृषीविषयक सेवांचा लाभ वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा,यासाठी सर्व शेतकऱ्यांनी अँग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करून या डिजिटल उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा,असेही त्यांनी आवाहन केले.