भुम (प्रतिनिधी)- परंडा व भूम या दोन तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या आयान तथा बाणगंगा सहकारी साखर कारखाना ईडा - जवळा या कारखान्याला ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांची थकीत ऊस बील न दिल्यामुळे कारखान्याच्या गेट समोर धरणे आंदोलन करण्यात आले. अखेर 13 जुलैपर्यंत बील अदा करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
यापूर्वी शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर 5 जूलै पर्यंत देण्यात येतील. असे लेखी आश्वासन कारखान्याचे जनरल मॅनेजर यांनी मागील शेतकरी संघटनेच्या आंदोलनावेळी दिले होते. परंतु तारीख संपली तरी बीलं मिळाली नाहीत. आश्वासन पाळले नाही म्हणून शेतकऱ्यांनी कारखाना गेटसमोर धरणे आंदोलन केले. गत गाळप हंगामातील जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात तोडणी केलेल्या ऊसाची बीलं थकीत आहेत. तात्काळ बील अदा करावे, या मागणीसाठी 182 शेतकऱ्यांनी आंदोलन केले. सोमवार दि. 13 जुलै रोजी पर्यंत बील अदा करावे, अन्यथा पुढील आंदोलन तीव्र करण्याचा ईशारा देत शेतकऱ्यांनी सायंकाळी 6 : 30 वाजता आंदोलन स्थगित केले.
